मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या आधी शिवसेना नेते तथा मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नियोजित अयोध्या दौऱ्याच्या अनुषंगाने आज शिवसेना भवनात सेना नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत म्हणाले, ही आमची पायवाट आहे. अयोध्या शिवसेनेसाठी नवीन नाही. गेली ३० वर्षे शिवसेना आणि अयोध्या यांचं एक नात निर्माण झालेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला काय फार तयारी करावी लागणार नाही. प्रत्येक शिवसैनिक किंवा शिवसेनेचा पदाधिकारी, हा सतत अयोध्येत जात-येत आहे. मी स्वत: जातो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री नसतानाही जाऊन आले आणि मुख्यमंत्री झाल्यावरही जाऊन आले. आदित्य ठाकरे हे देखील अनेकदा जाऊन आलेले आहेत, दर्शन घेऊन आले आहेत.
कोविडच्या संपूर्ण कालखंडात काही निर्बंधांमुळे आम्हाला जाता आलं नाही. नाहीतर आमचा हा जाण्याचा कार्यक्रम हा तेव्हापासूनच ठरलेला आहे. आता या संदर्भात आमच्या बैठका सुरू आहेत. या चार-पाच दिवसांमध्ये तारीख ठरवू. शरयूच्या तीरावर जेव्हा एखादा कार्यक्रम करायचा, तेव्हा अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आमचे कार्यकर्ते त्यासाठी तिकडे गेलेले असल्याचेही त्यांनी सांगितले.
आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा हा पिकनिक दौरा असल्याची टीका केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी केली, यावर प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की, कोण काय बोलतय आणि कोणाला काय बोलायचंय यावर आमचे दौरे ठरत नाही. अयोध्याच्या आंदोलनात शिवसैनिक होते. अयोध्येच्या आंदोलनात शिवसैनिकांचं बलिदान झालेलं आहे आणि जर अशा प्रकारचं जर कोणी वक्तव्य करत असेल, तर तो त्या आंदोलनाचा अपमान आहे आणि त्या बलिदानाचा अपमान असल्याचा पलटवार त्यांनी राणे यांनी केला.
हे सरकार लवकरच कोसळू शकतं असं विरोधकांकडून बोललं जात असल्याने, ५० वर्षे शिवसेना वादळांशीच संघर्ष करत इथपर्यंत पोहचलेली आहे. आम्हाला वादळं नवीन नाहीत, वादळं परतून लावण्या इतकी आणि नवीन वादळ निर्माण करण्याची क्षमता व ताकद महाराष्ट्राच्या राजकारणात फक्त शिवसेनेमध्येच आहे. शिवसेना आणि भीती या दोन शब्दांचा कधी मेळ बसत नाही. भीती हा शब्द आमच्या शब्दकोषात नसल्याचे त्यांनी निक्षून सांगितले.
Marathi e-Batmya