भाजपाचे माजी खासदार किरिट सोमय्या हे राज्यातील शांतता भंग करण्याचे काम करत असून बुनबुडाचे, बेछुट आरोप करून मुंबई पोलिसांनाही बदनाम करण्याचा सुरु केलेला उद्योग त्यांनी थांबवावा. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. नौटंकीबाज सोमय्या हे वारंवार राज्य सरकार, पोलीस व प्रशासनाच्या कामात अडथळे आणून अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत अरेरावीही करत आहेत. सोमय्यांची ही दंडेलशाही राज्य सरकारने खपवून न घेता त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली.
यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, किरीट सोमय्या हे धादांत खोटे आरोप करून विरोधी पक्षातील नेत्यांना बदनाम करत आहेत. वारंवार सरकारी कामात हस्तक्षेप करून अधिकाऱ्यांवरही बिनबुडाचे आरोप करत आहेत. खासदार नवनीत राणा यांना खार पोलिसांनी अटक केल्यानंतर रात्री खार पोलिस स्टेशनमध्ये जाऊन सोमय्या व त्यांच्या समर्थकांनी जाणीवपूर्वक गोंधळ घातला. आपली हत्या करण्याचा डाव असल्याचा त्यांचा आरोप अत्यंत हास्यास्पद आहे. आज पुन्हा पोलिस स्टेशनमध्ये जाऊन सोमय्या यांनी गोंधळ घालत पोलीस आयुक्त व मुख्यमंत्री यांना आव्हानाची भाषा केली.
किरीट सोमय्या यांनी आजपर्यंत केलेले आरोप सिद्ध झालेले नाहीत. केवळ महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून राज्यात अराजक माजवण्याचे काम ते करत आहेत. महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे. सोमय्या सारखे जे लोक राज्यातील शांतता भंग करून वातावरण बिघडवण्याचे काम करत आहेत. दररोज खोटे आरोप करून महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. प्रशासकीय कामाकाजात अडथळे आणत आहेत त्यांच्यावर सरकारने सक्तीने कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली.
काही दिवसांपूर्वी अमरावतीच्या राणा दांम्पत्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे भेटायला गेले होते. त्यावेळी त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. त्याची तक्रार करण्यासाठी ते पुन्हा पोलिस ठाण्यात गेले. मात्र त्यावेळी त्यांनी दिलेल्या जबाबनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र मी दिलेल्या जबाबापेक्षा वेगळाच गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला. त्यानंतर याच प्रकरणी नुकताच दिल्ली दौऱा करत यासंदर्भातील तक्रार केंद्रीय गृह विभागाच्या सचिवांकडे केली. त्यानंतर आज सोमय्या यांनी खार पोलिस ठाण्यात जात सदर एफआयआरवरील सही ही माझी नसल्याचा कांगावा सुरु केला. तसेच याप्रकरणी पुन्हा गुन्हा नोंदवावा अशी मागणी खार पोलिस ठाण्यात केली. त्यावरून काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मविआ सरकारकडे मागणी केली.
Marathi e-Batmya