अनिल देशमुख यांचा सवाल, राज्यात कायद्याचा धाक उरलाय की नाही? २४ तासात दोन घटना घडल्या

पुणे जिल्ह्यातील नसरापूर (भोर) येथे साडेतीन वर्षीय चिमुकलीवर ६० वर्षीय नराधमाने केलेला अत्याचार आणि तिची निघृण हत्या, ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. महाराष्ट्र दिनी अशी लाजीरवाणी घटना घडणे हे राज्यासाठी अत्यंत क्लेशदायक आहे.या घटनांवरून राज्यात कायद्याचा धाक शिल्लक आहे की नाही,असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधताना उपस्थित केला.

पुढे बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, ही घटना ताजी असतानाच, २४ तासांच्या आत चाकण परिसरातही एका चिमुरड्यावर अत्याचार करून त्याची हत्या झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनांवरून राज्यात कायद्याचा धाक शिल्लक आहे की नाही,असे देशमुख बोलताना म्हणाले.महाविकास आघाडी सरकारच्या काळात, मी गृहमंत्री असताना महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत कठोर असा ‘शक्ती कायदा’ विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर केला होता. या कायद्यात गुन्हेगाराला २१ दिवसांत फाशी देण्याची तरतूद आहे. मात्र, दुर्दैवाने हा कायदा केंद्राकडे अंतिम मंजुरीसाठी प्रलंबित आहे. राज्यात महिलांवरील अत्याचार वाढत असतानाही केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांकडे बोट दाखवून वेळ मारून नेत आहेत. जर आज शक्ती कायदा राज्यात लागू असता, तर नसरापूरच्या त्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती आणि अशा गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण झाला असता ,असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.

शेवटी बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील या दोन्ही घटना अत्यंत संतापजनक आहेत. ६०-६५ वर्षाचे नराधम चिमुकल्यांना लक्ष्य करत आहेत, ही विकृती रोखण्यासाठी सरकारकडे कोणतीही ठोस यंत्रणा नाही. महिला व बालकांच्या सुरक्षेबाबत विद्यमान सरकार पूर्णतः निष्क्रीय ठरले आहे, नसरापूर आणि चाकण येथील खटले ‘फास्ट ट्रॅक’ कोर्टात चालवून या नराधमांना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी. तसेच, यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी राजकीय श्रेयवाद बाजूला ठेवून ‘शक्ती कायदा’ तातडीने लागू करावा,अशी मागणी केली.

About Editor

Check Also

सुनिल तटकरे यांची स्पष्टोक्ती, जयंत पाटील आणि आमची भेट नाही, अर्थखात्याची चर्चा झाली हा तर्क कुठला ज्या पध्दतीने दादांशी संवाद होता त्याचपध्दतीचा संवाद वहिनींशी आहे. त्यामुळे गैरसमज असण्याचा प्रश्नच येत नाही किंवा उद्भवत नाही...

जयंत पाटील आणि आमची भेट तिथे झाली नाही. आम्ही आलो जयंत पाटील आले आणि अर्थ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *