लोकसभा निवडणूकीचे निकाल नुकतेच जाहिर झाले. या निकालाने एनडीएला बहुमत दिलेले असले तरी भाजपाचे संख्याबळ कमी झाले आहे. तर संपूर्ण इंडिया आघाडीला २३५ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे इंडिया आघाडीला केंद्रातील सरकार स्थापन करण्यासाठी आणखी दोन-तीन मित्र पक्षांची आवश्यकता आहे. यापार्श्वभूमीवर आज इंडिया आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाच्या एनडीए आघाडीचा भाग असलेल्या तेलगू देशम आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न इंडिया आघाडीकडून करण्यात येत असल्याची चर्चा सुरु आहे.
इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी आले असता काही प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, यावेळी शरद पवार म्हणाले की, सरकार स्थापनेसाठी आघाडीची संख्या वाढवण्यासाठी तेलगू देसम किंवा जनता दल संयुक्त यांच्याशी संपर्क साधण्याबाबत अद्याप इंडिया आघाडीत कोणतीही चर्चा झालेली नाही, असे सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर चर्चा करण्यासाठी आणि जनता दल (युनायटेड) (जेडी-यू) आणि तेलुगू देसम पक्ष (टीडीपी) यांना पक्षात आणायचे की नाही यावर विचारमंथन करण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी आज संध्याकाळी इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीपूर्वी त्यांनी हे वक्तव्य केले.
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, टीडीपी किंवा जेडी(यू) कडे पाठिंब्यासाठी इंडिया आघाडीत अद्याप अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. “आम्ही अद्याप याबद्दल बोललो नाही,” असे स्पष्ट सांगितले.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, आघाडीच्या नेत्यांची बुधवारी बैठक होत असून त्या बैठकीत एकत्रित निर्णय घेतला जाणार आहे. माझे वैयक्तिक मत नाही. आम्ही जो निर्णय घेऊ, तो सामूहिक निर्णय असेल, असे स्पष्ट केले.