लोकसभा निवडणूकीत अवघ्या ४८ मतांनी विजयी ठरलेले शिवसेना शिंदे गटाचे खासदार रविंद्र वायकर यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून सातत्याने आरोप करण्यात येत आहेत. त्यातच ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांनी निवडणूक निकालावरून न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. तसेच मतमोजणीच्या दिवशी वायकर याचे मेहुण्याने मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल नेल्याच्या आरोपावरून त्यांच्यासह सात – आठ जणां विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
या सगळ्या घडामोडीत आतापर्यंत काहीसे शांत असलेले आणि शिंदे गटात जाण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिलेले ऱविंद्र वायकर यांनी या वादाबद्दल पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त करत, ठाकरे गटाच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले.
ठाकरे गटावर पलटवार करताना रविंद्र वायकर म्हणाले की, मागील दोन आठवड्यापासून बघतोय. पण सातत्याने माझ्या विरोधात आरोप करण्यात येत आहे. पराभव जिव्हारी लागल्यानेच ठाकरे गटाकडून रडिचा डाव खेळला जात आहे. मात्र त्यांना काय करायचे ते करू दे असे सांगत आपली भूमिका स्पष्ट केली.
पुढे बोलताना रविंद्र वायकर म्हणाले की, एक हजार पोलिस, २० उमेदवार, २० उमेदवारांचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रामध्ये उपस्थित होते. इतके सगळे जण असताना रविंद्र वायकर आत जाऊन काय तरी कसा करू शकतो. हे कसं शक्य आहे. हे मला कळत नाही. पराभव जिव्हारी लागल्यानेच त्यांचे ट्विट आणि हे सगळं सुरु आहे. या गोष्टीला मी फारसे महत्व देत नाही. त्यांना जे काय करायचं ते करू द्या असे सांगत ज्या पध्दतीने निवडणूक घेतली गेली ती पाहता योग्य पध्दतीने घेतली गेली. कोणी कोणाचा नातेवाईक आहे म्हणून त्याने ईव्हीएम हॅक, असं ईव्हीएम हॅक करता येत का, त्यामुळे या प्रश्नावर मला उत्तर द्यावसं वाटत नाही असे सांगत आपली भूमिका स्पष्ट केली.
Marathi e-Batmya