सोमवारी विधान परिषद सभागृहात शाब्दिक चकमकीनंतर सभापती यांनी आज केलेल्या निलंबनाच्या कारवाईचा निर्णय हा एकांगी व अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केली.
पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, विरोधी पक्ष नेत्याला एकतर्फी आणि मनमानीपूर्वक निलंबित करणे हा लोकशाहीत विरोधकांना दिलेल्या स्वातंत्र्यावर हल्ला असून विरोधकांच्या आवाज दडपण्याचा प्रकार आहे. कितीही वेळा निलंबन झाले तरी जनतेच्या हितासाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी लढत राहू, असा निर्धारही यावेळी व्यक्त केला.
अंबादास दानवे पुढे बोलताना म्हणाले की, सभापती यांनी विधिमंडळ सभागृहात ठराव व चर्चा न घेता ठरवून पक्षपातीपणे निलंबनाची कारवाई केली आहे. भाजपाकडे असलेल्या पाशवी बहुमतावर विरोधी पक्षनेते यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. एकप्रकारे लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम हे भारतीय जनता पार्टी करत असल्याचा आरोपही यावेळी केला.
अंबादास दानवे पुढे बोलताना म्हणाले की, यापूर्वीही केंद्रात १५० खासदारांचे निलंबन करून भाजपाने आपण लोकशाही किती मानतो हे दाखवून दिले आहे. सभागृहात शिष्टाचार पाळला गेला पाहिजे, ही माझी नेहमीच भूमिका राहिली आहे. त्याबाबत मी आज सभागृहात दिलगिरी व्यक्त करणार होतो. मात्र आज सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी मला माझी भूमिका मांडू दिली नाही, असा आरोपही यावेळी केला.
विधान परिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ह्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.@iambadasdanve pic.twitter.com/EFIjkxq0rK
— Shivsena UBT Communication (@ShivsenaUBTComm) July 2, 2024