मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या आणि बहुप्रतीक्षित कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो 3चे उद्घाटन येत्या 24 जुलै रोजी होणार असल्याचे काल, बुधवारी केंद्र सरकारच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून जाहीर करण्यात आले. नंतर हे ट्वीट डिलिट करण्यात आले. यावरून सामाजिक तसेच आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पंतप्रधान कार्यालय (PMO) या फेक न्यूजबद्दल कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
मुंबईची पहिली भूमिगत मेट्रो लाइन, ‘अक्वा लाइन’ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ), 24 जुलै रोजी सुरू होणार आहे. आरे कॉलनी ते कफ परेड या 33.5 किमी मार्गाच्या मेट्रोसाठी 27 थांबे आहेत, असे ट्वीट @mygovindia या अधिकृत केंद्र सरकारच्या ट्विटर हॅण्डलवरून केले होते. पण कालांतराने ते डिलिटही करण्यात आले. पण त्यापूर्वी भाजपा नेत्यांसह अनेक मान्यवरांनी आपापल्या ट्विटर हॅण्डलवरून त्याची माहिती दिली होती.
या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी या खुद्द सरकारकडूनच प्रसारित झालेल्या ‘फेक न्यूज’ला आक्षेप घेतला आहे. मुंबईची पहिला भूमिगत मेट्रो मार्ग 24 जुलैपासून सुरू होणार आहे, अशी फेक न्यूज भारत सरकारच्या ट्विटवर देण्यात आली होती आणि त्यावर सगळ्यांचा विश्वास बसला होता. त्यानंतर विनोद तावडे यांच्यासह इतर मान्यवर या फेक न्यूजच्या जाळ्यात अडकले. त्यामुळे पीएमओ यावर कारवाई करेल का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.