Breaking News

राहुल गांधींच्या केसालाही धक्का लावाल तर… नाना पटोले यांचा इशारा तरविंदरसिंह मारवाच्या विधानावर मोदी, शाह व भाजपाने भूमिका स्पष्ट करावी

दिल्ली भाजपाचा नेता व माजी आमदार तरविंदरसिंह मारवा याने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे, हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. मारवा यांचे विधान हा भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा आहे. भाजपाला गांधी नावाची ऍलर्जी आहे म्हणूनच मोदींपासून सर्वच नेते राहुल गांधी यांची सातत्याने बदनामी करत असतात. आतातर भाजपाने सर्व मर्यादाच सोडल्या आहेत. राहुल गांधी यांच्या एका विधानावरून त्यांना माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या सारखेच मारु, अशी धमकी दिली आहे. ही धमकी देणाऱ्या भाजपाचा दिल्लीतील माजी आमदार तरविंदरसिंह मारवाच्या मुसक्या आवळा, अशी मागणी करून राहुल गांधींच्या केसालाही धक्का लावाल तर याद राखा, असा खणखणीत इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.

यासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजपाचा माजी आमदार तरविंदरसिंह मारवा याचे विधान अत्यंत आक्षेपार्ह व भडकाऊ आहे. गांधी कुटुंबाने देशासाठी तीन बलिदान दिली आहेत. महात्मा गांधी, इंदिरा गांधी व राजीव गांधी देशासाठी शहीद झाले. गांधी कुटुंबाच्या जीवाला आजही धोका आहे तरीही राहुल गांधी जीवाची पर्वा न करता सर्वसामान्य जनतेत मिसळतात. तरविंदरसिंह मारवा हा भाजपाच्या नफरतच्या फॅक्टरीत तयार झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी यावर भुमिका स्पष्ट करावी. राहुल गांधी यांच्या जीवाला काही झाले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची असेल असा इशाराही यावेळी दिला.

शेवटी बोलताना नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्ष व नरेंद्र मोदी यांना थेट भिडणारा नेता अशी राहुल गांधी यांची प्रतिमा आहे. सत्ताधारी पक्षाला जाब विचारण्याचे काम राहुल गांधी करत आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयाचा रथ रोखण्याचे काम राहुल गांधी यांनी केले. खासदार राहुल गांधी यांना बदनाम करण्यासाठी भाजपा व त्यांच्या आयटी सेलने कोट्यवधी रुपये खर्च केले तरीही राहुल गांधी यांच्यावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही उलट राहुल गांधी यांची विश्वासार्हता नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा जास्त वाढली आहे. भाजपाला गांधी खुपतात म्हणनूच त्यांच्या बदनामीसाठी मोहिम राबवावी लागते. राहुल गांधी घाबरत नाहीत म्हणून आता त्यांना संपवण्याचीच भाषा केली जात असल्याचा आरोपही यावेळी केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत