विधानसभा निवडणूकीत काहीही करून गद्दारांना धडा शिकवायचा म्हणून शिवसेना उबाठा गटाने प्रत्येक उमेदवाराची काळजीपूर्वक तपासणी करत उमेदवारी जाहिर केली. त्यासाठी निष्ठावान कोण, तोंड देखलं कोण याची रितसर खातरजमा करूनच उमेदवारांची यादीही जाहिर केली. मात्र विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहिर करण्यात आलेले किशनचंद तनवाणी यांना जाहिर झालेली उमेदवारी शिवसेना उबाठा पक्षाला परत केल्याची घटना घडली आहे.
विशेष म्हणजे औरंगाबाद मध्यमधून शिवसेना उबाठा पक्षाने उमेदवारी जरी जाहिर केलेली असली तरी या मतदारसंघातून एमआयएम पक्षाचा उमेदवार निवडूण येणार असल्याचे कारण पुढे करत जाहिर केलेली उमेदवारी परत दिली आहे.
किशनचंद तनवाणी यांच्याकडे सध्या संभाजीनगर जिल्हाप्रमुख पदाचा कार्यभार आहे. मात्र शिवसेना उबाठाची उमेदवारी नाकारत संभाजी नगर मध्यच्या जागेवर एमआयएमचा उमेदवार निवडूण येणार असल्याचे कारण पुढे केले. त्यामुळे शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी किशनचंद तनवाणी यांच्या शिवसेना उबाठाच्या सर्व पदावरून मुक्त केले. तसेच किशनचंद तनवाणी यांच्याऐवजी शिवसेना उबाठाचे शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांना संभाजीनगर मध्य मधून विधानसभेची उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे.
तसेच पक्षविरोधी भूमिका घेतल्याने जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांची तातडीने पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने पदावरून कार्यमुक्त केले. सदरील सर्व घोषणा मातृभूमी प्रतिष्ठाण संपर्क कार्यालयात आयोजित अधिकृत पत्रकार परिषदेत केली. याप्रसंगी शिवसेना सचिव अशोक पटवर्धन, सह संपर्कप्रमुख त्र्यंबक तुपे व महानगरप्रमुख राजु वैद्य उपस्थित होते.
Marathi e-Batmya