राज्यातील संशयातीत बहुमत मिळविणाऱ्या महायुती सरकारच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदावरील असे मिळून तिघांचा शपथविधी नुकताच पार पडला. परंतु मागील अनेक दशकांपासून मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान म्हणून ओळखला जाणारा वर्षा बंगला मात्र यापुढे मुख्यमंत्र्यांचा बंगला नव्हे तर उपमुख्यमंत्र्यांचा बंगला म्हणून ओळखला जाणार असून विरोधी पक्षनेता, उपमुख्यमंत्री म्हणून रहात असलेला सागर बंगला मात्र आता मुख्यमंत्र्यांचा अधिकृत शासकिय बंगला म्हणून लवकरच नावा रूपाला येणार असल्याची माहिती पुढे येत आहे.
महायुतीचा शपथविधी सोहळा ठरल्यानंतर त्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे सत्ता स्थापनेत सहभागी होणार की नाही याबाबत अनिश्चितता होती. त्यामुळे शिवसेना पक्ष हा पक्ष पुन्हा दुसऱ्यांदा फुटीच्या उंबरठ्यावर आला. त्यामुळे अखेर एकनाथ शिंदे यांनी भाजपाचे नेते तथा महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शपथविधी सोहळ्यात सहभागी होणार असल्याचे पत्र लिहिले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही एकनाथ शिंदे यांचे नाव आयत्यावेळी शपथविधी सोहळ्यात समाविष्ट करण्याची शिफारस केल्याचा इतिहास सर्वश्रुतच आहे.
मात्र काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून तात्पुरत्या स्वरूपात दिलेले शासकिय निवासस्थानी अर्थात वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे हे रहात होते. मात्र राज्याचा नवा मुख्यमंत्री म्हणून त्यांचेच सहकारी देवेंद्र फडणवीस हे नियुक्त झाल्यानंतर मात्र हे शासकिय निवासस्थान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून रिक्त करून नव्या मुख्यमंत्र्यांसाठी उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. परंतु दोन दिवसापासून मुख्यमंत्र्यांसाठी राखीव असलेले वर्षा हे निवासस्थान अद्यापही एकनाथ शिंदे यांनी आपल्याच ताब्यात ठेवले आहे.
दरम्यान, वर्षा या शासकिय निवासस्थानाची पाहणी केली असता आजही वर्षा या शासकिय बंगल्याच्या प्रवेशद्वारावर एकनाथ शिंदे यांचे नाव आहे. तसेच वर्षा या बंगल्यात मुख्यमंत्र्यांना भेटायला येणाऱ्यांच्या नागरिकांना सुरक्षेच्या कारणास्तव शेजारीच लागून असलेल्या तोरणा या बंगल्यातून जावे लागते. परंतु एकनाथ शिंदे हे अद्यापही वर्षा या बंगल्याच्या निवासस्थानी रहात असल्याने वर्षा या बंगल्याच्या निवासस्थानासह तोरणा बंगल्याचा ताबा आणि नंदनवन या बंगल्याचा ताबाही एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे. त्यामुळे एका उपमुख्यमंत्र्याला राहण्यासाठी तीन तीन बंगले कशासाठी असा सवाल करण्यात येत असताना प्रशासनाने मात्र एकनाथ शिंदे यांच्या नावाखाली लिहिलेली मुख्यमंत्री अक्षरे मात्र झाकून ठेवली आहेत. तसेच विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अद्यापही सागर या शासकिय निवासस्थानीच रहात आहेत.
या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या प्रशासनाकडून आतापर्यंत मुख्यमंत्र्यांचे शासकिय निवासस्थान म्हणून राखून ठेवण्यात आलेले वर्षा हे शासकिय बंगला हा उपमुख्यंत्र्यांसाठीचे शासकिय निवासस्थान बनणार आहे. तर विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रहात असलेले शासकिय निवासस्थान सागर बंगला हा आता मुख्यमंत्र्यांचे शासकिय निवासस्थान म्हणून लवकरच ओळखला जाणार असून तशी व्यवस्था राज्याच्या प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
Marathi e-Batmya