ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोजकुमार यांच्या निधनाने भारतीय सिनेसृष्टीतील एका महान व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे. चित्रपटांच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती आणि भारतीय समाजजीवन जनमानसावर बिंबवणाऱ्या या अष्टपैलू आणि भारतकुमार हे नाव खऱ्या अर्थाने सार्थकी लावणाऱ्या कलाकाराला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
‘शहीद’ मध्ये भगतसिंग साकारून मनोजकुमार हे देशाला सुपरिचित झाले. त्यानंतर शेतीसारखा विषय त्यांनी चित्रपटातून हाताळला आणि ‘मेरे देश की धरती’ सारखे गीत आजही प्रत्येक स्वातंत्र्यदिनाला त्याच अभिमानाने ऐकले जाते. त्यांच्या ‘पुरब और पश्चिम’ सारख्या चित्रपटांनी तर जागतिक पातळीवर अनेक विक्रम प्रस्थापित केले. ‘रोटी कपडा और मकान’ सारख्या चित्रपटांनी त्यांनी सामाजिक विषयांना हात घातला. उपकार, क्रांती असे अनेक चित्रपट त्यांनी गाजवले. त्यांनी आपल्या प्रत्येक कलाकृतीतून देशप्रेमाची आणि राष्ट्रीयत्वाची भावना रुजवण्यासाठी प्रयत्न केले. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी दिलेले योगदान अमूल्य असून त्यांची जागा कधीही भरून निघणार नाही. मनोजकुमार यांनी दिग्दर्शन, पटकथा-गीत लेखन, संकलन या क्षेत्रातही काम केले. त्यांनी अनेक नवोदित कलाकारांना संधी दिली. त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री आणि दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांच्या निधनाने हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार हरपला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि कोट्यवधी चाहत्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त होवो, अशी मी प्रार्थना करतो, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
0000
ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांच्या निधनामुळे भारतभूमीचा सच्चा सुपुत्र हरपला- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मेरे देश की धरती, ए वतन ए वतन हम को तेरी कसम, अशी एकाहून एक सरस देशभक्तीपर गीते ज्यांच्यावर चित्रित झाली, असे ज्येष्ठ निर्माते, पटकथाकार, दिग्दर्शक, अभिनेते मनोजकुमार म्हणजे सर्वांचे ‘भारतकुमार’ यांच्या निधनामुळे भारतभूमीचा एक सच्चा सुपुत्र हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
आपल्या शोकसंदेशात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, आपल्या अभिनय कारकिर्दीत शहीद, पुरब और पश्चिम, हिमालय की गोद मै, हरियाली और रास्ता, रोटी कपडा और मकान, क्रांती अशा विविध सिनेमात मनोजकुमार यांनी मुख्य भूमिका साकारल्या. सिनेमांमधून देशभक्ती, शेतकरी कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसहित भारतीयत्वाची भावना देशवासियांच्या मनात रुजवण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला.
आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हे क्रांतिकारकांच्या बलिदानाने मिळलेले असून त्यांचा आपल्याला कधीही विसर पडू नये यासाठी त्यांनी आपल्या कलाकृतीमधून लोकांना त्यांची जाणीव करून दिली. मनोजकुमार यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानाबद्दल २०१६ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले.
भारतभूमीला वंदनीय मानणारा हा सच्चा कलावंत आज भारतभूमीच्या कुशीत कायमचा विसावला आहे. अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
……………………………..
भारतीय सिनेसृष्टीतील महान युगाचा अंत – उपमुख्यमंत्री अजित पवार
ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि ‘भारतकुमार’ म्हणून ओळखले जाणारे मनोजकुमार यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका महान युगाचा अस्त झाला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोजकुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांनी देशभक्तीपर चित्रपटांच्या माध्यमातून जनमानसात देशप्रेम जागवले. ‘उपकार’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘क्रांती’ यांसारख्या चित्रपटांनी त्यांनी समाजातील वास्तव आणि देशासाठी असलेली निष्ठा मोठ्या ताकदीने मांडली. त्यांच्या अभिनयात आणि दिग्दर्शनात असलेली राष्ट्रभक्ती ही आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी दिलेले योगदान अमूल्य असून त्यांची जागा कधीही भरून निघणारी नाही. ‘दादासाहेब फाळके’, ‘पद्मश्री’ पुरस्कारप्राप्त असलेले मनोजकुमार हे अनेक नवोदित कलाकारांचे प्रेरणास्थान होते.
त्यांच्या निधनाने हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकार हरपला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त होवो, अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात केली आहे.
…
‘भारतकुमार’ यांना अखेरचा दंडवत! – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार
हिंदी चित्रपट सृष्टीचे सुप्रसिद्ध ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक आणि प्रतिभावंत अभिनेते मनोज कुमार यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीतील एका सुवर्णयुगाचा अंत झाला आहे.
शहीद, उपकार, पूरब और पश्चिम, ‘रोटी, कपडा और मकान’ आणि क्रांति यांसारख्या अजरामर चित्रपटांद्वारे देशभक्तीचा जाज्वल्य अभिमान त्यांनी जपला आणि प्रत्येक भारतीयाच्या हृदयात राष्ट्रप्रेम जागवलं. देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या मनोज कुमार यांना ‘भारतकुमार’ या नावाने ओळखले जात असे. त्यांचे सिनेमे, त्यांची गाणी आणि त्यांचे विचार सदैव आपल्यासोबत राहतील.
त्यांच्या आत्म्यास ईश्वर सद्गती देवो, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Marathi e-Batmya