मुंबईः प्रतिनिधी
केंद्रात पुन्हा एकदा फिर एक बार मोदी सरकारचा नारा देत भाजपाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीपासून दुरावलेल्या सर्व घटक पक्षांना जवळ करण्याचा प्रयत्न केला. त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीतील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रालोआतील सर्व नेत्यांना बोलावले. मात्र या गर्दीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे काही दिसले नसल्याची चर्चा राज्यातील राजकारणात सुरु झाली आहे.
राज्यात आणि केंद्रातील सत्तेत भाजपाबरोबर शिवसेना सहभागी आहे. मात्र मागील चाडेचार ते पाच वर्षात शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडून सातत्याने पंतप्रधान मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावर टीका केली. तरीही अखेर निवडणूकीसाठी भाजप आणि शिवसेनेने युती केली.
काही दिवसांपूर्वी लातूर येथील सभेत नरेंद्र मोदी यांनी उध्दव ठाकरे यांची लहान भाऊ म्हणून उल्लेख केला. त्यामुळे किमान निवडणूक कालावधी पुरता तरी उध्दव ठाकरे यांना मान-सन्मान मिळणार असल्याची चर्चा सुरु होती. परंतु गुजरात मधील गांधीनगर येथे भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्यावेळी ठाकरे यांना साईडलाईन केल्याचे चित्र विविध वाहिन्यांवर पाहायला मिळाले. मात्र मोदी यांच्या उमेदवारी अर्जाच्या निमित्ताने जमलेल्या रालोआच्या नेत्यांमध्ये मात्र उध्दव ठाकरे हे पुर्णपणे झाकोळून गेल्याचे दिसून येत असून त्यांना एका कोपऱ्यात जागा दिल्याचे दिसते. उध्दव ठाकरे यांना भाजपा नेते राजनाथ सिंह, अमित शाह, नरेंद्र मोदी आणि अकाली दलाचे प्रकाशसिंह बादल यांच्या रांगेत बसालयला जागा दिली. मात्र उध्दव ठाकरे हे फारच कोपऱ्यात सरकावल्याचे दिसून येते.
Marathi e-Batmya