मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर हे सर्व कबुतर खाने मुंबई महापालिकेने बंद केले. त्यामुळे प्राणी मित्रांमध्ये नागरिकांमध्ये नाराजी निर्माण होत आहे. तर कोल्हापूरच्या नांदणी मठातील हत्ती उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आकाश अंबानीच्या गुजरातमधील वनतारा प्रकल्पात स्थलांतरीत करण्यात आले. मात्र तमाम कोल्हापूरकरांकडून वनतारात स्थलांतरीत करण्यात आलेला हत्ती पुन्हा नांदणी मठात परत आणण्याची मागणी तमाम कोल्हापूरकरांकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः तज्ञांना पाचारण करून या दोन्ही विषयासंदर्भात बैठक घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
कबुतरखाने बंद करण्याबाबत कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहून लोकांच्या भावना विचारात घेण्याचे आवाहन केले.
सोमवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कबुतरखान्याच्या आणि नांदनी मठाच्या हत्तीच्या मुद्द्यावर मंगळवारी बैठक बोलावण्यात आली आहे. कबुतर खान्याबाबत न्यायालयाचा निर्णय आहे आणि आपल्याला जनतेच्या भावनांकडेही लक्ष द्यावे लागेल. दोन्ही प्रकरणांमध्ये तज्ञांशी चर्चा करून योग्य तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. शनिवारी महापालिकेने बॅनर लावून दादरमध्ये कबुतरखाने बंद केले होते.
रविवारी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहून कबुतरांना खायला देण्यावरील बंदीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सूचना दिल्या.
मंगल प्रभात लोढा यांनी महापालिका प्रशासनाला सांगितले की, कबुतरांना खायला देणे बंद करताना पक्षीप्रेमी, संत आणि सामान्य लोकांनी व्यक्त केलेल्या भावनांचाही विचार करणे आवश्यक आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करत मध्यम मार्ग काढण्याची गरज असल्याचे सांगत कबुतरांना खायला देण्यावरील बंदी लागू झाल्यापासून मुंबईत रस्त्यावर कबुतरे मृतावस्थेत आढळत आहेत, ज्यामुळे आरोग्याशी संबंधित नवीन समस्या निर्माण होत आहेत.
जैन समाजाने उपोषणाचा इशारा दिला आहे. दरम्यान, दादरमधील कबुतरखाना बंद करण्याच्या निषेधार्थ जैन समाजाने आंदोलनाचा इशारा दिला आहे. माजी नगरसेवक पूरण दोशी म्हणाले की, जर दादरमधील बंद कबुतरखाना उघडला नाही तर १० ऑगस्टपासून जैन समाजाचे लोक आणि संत उपोषण करतील. मुंबईत ५१ कबुतरखाना आहेत. कबुतरांमुळे स्थानिक रहिवाशांना श्वसनाचे त्रास, दुर्गंधी आणि प्रदूषणाचा सामना करावा लागत असल्याचा आरोप लोकांनी केला होता, त्यामुळे कबुतरखाना बंद करण्याची मागणी बऱ्याच काळापासून होती. दादरचे कबुतरखाना ब्रिटिश काळातील असल्याचे मानले जाते. १९३३ मध्ये पाण्याच्या कारंज्या म्हणून त्याची स्थापना करण्यात आली.
मंगल प्रभात लोढा यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली
कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. त्यांनी सांगितले की, कबुतर देखील सजीव प्राणी आहेत, त्यांच्याशी असे अमानुष वर्तन योग्य नाही. राष्ट्रीय उद्यानात त्यांच्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी आणि जर कबुतरांपासून आजार पसरत असतील तर त्यासाठी योजना आखावी अशी सूचना केली.
Marathi e-Batmya