शिवसेनेच्या वतीने पालघर जिल्ह्यातील आदिवासी युवक युवतींचा सामूहिक विवाह सोहळा गेली अनेक वर्षे आयोजित केला जातो. यावर्षी या सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना व्हिडीओ कॉल करून त्यांच्याशी संवाद साधला.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी, बोईसरमधील शिवसेना आदिवासी समाज विभाग आणि आधार प्रतिष्ठान यांच्यावतीने दरवर्षी बोईसर मध्ये या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षी या सोहळ्यात सहभागी होऊन लग्न केलेल्या नवरी आणि नवरदेवाने कायम सुखा समाधानाने नवीन आयुष्याला सुरुवात करावी अशा शुभेच्छा देतो असे शिंदे यांनी सांगितले. आजच्या या सामुदायिक विवाह सोहळ्यात २०१ आदिवासी जोडप्यांचा विवाह संपन्न होत आहे ही अत्यंत आनंदाची आणि समाधानाची बाब असल्याचे मत व्यक्त केले.
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, मला या सोहळ्याला प्रत्यक्षात उपस्थित राहून तुम्हा सर्वांना भेटायचे होते मात्र, काही कारणामुळे मला माझा हा नियोजित दौर रद्द करावा लागला. म्हणून मी तुमच्याशी या व्हीडीओच्या माध्यमातून संवाद साधत असल्याचे यावेळी सांगितले.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, मंडपात जेवढ्या नववधू आहेत त्या सर्व माझ्या लाडक्या बहीणी आहेत. त्यामुळे हे माझ्या घरातलाच लग्नसोहळा आहे. त्याचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल शिवसेनेचे उपनेते आदिवासी समाज महाराष्ट्र संघटक आणि आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष जगदीश धोडी, सह संपर्क प्रमुख आणि आधार प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष वैभव संखे आणि शिवसेनेच्या सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो असे सांगितले.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवणे हे शिवसेनेच्या रक्तातच आहेत. आजचा हा सामुहिक विवाह सोहळा त्याचेच प्रतिक आहे. लग्न कार्यासाठी अनेक जण कर्ज काढतात. जमीन गहाण ठेवतात. हे कर्ज फेडता फेडता वधू पित्याचं कंबरडं मोडतं. मात्र या गोरगरीबांना सहाय्य करण्यासाठी शिवसेनेसह पालघरमधील सामाजिक संस्थांनी भव्य सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केलाय. हा सोहळा तुम्ही त्यांना वैवाहिक आयुष्यात लागणारे सर्व साहित्य देता, तसेच सर्व विधी पार पाडून घरातील सदस्यांप्रमाणे त्यांचे लग्न लावून देता, यानिमित्ताने सगळे आमदार, खासदार पदाधिकारी आवर्जून उपस्थित राहता हे खरोखरच कौतुकास्पद असल्याचे मतही व्यक्त केले.
शेवटी एकनाथ शिंदे म्हणाले की, जगात युध्दजन्य परिस्थितीमुळे आज सर्वच देशांवर आर्थिक संकट कोसळलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी देशवासियांना काटकसरीचे आवाहन केले आहे. हा सोहळा म्हणजे त्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासारखेच आहे. हा फक्त एक विवाह सोहळा नाही, तर हे सामाजिक बांधिलकीचं आणि एकात्मतेचं एक मोठं उदाहरण आहे असे सांगत सर्वांचे विशेष कौतुक केले.
यावेळी शिवसेना उपनेते जगदीश धोडी यांनी शिंदे यांचे आभार मानले. तसेच २०२३ साली या कार्यक्रमाला उपस्थित राहिले असता आदिवासी कन्यादान योजनेचा निधी १० हजारांचा वाढवून २५ हजार करण्याचा निर्णय शिंदे यांनी घेतला होता. त्याचा लाभ अनेक आदिवासी महिला भगिनींना होत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. तसेच उपस्थित सर्व जोडप्यांच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.
Marathi e-Batmya