नागपूर: प्रतिनिधी
नागपुर आणि इतर जिल्हयात अतिवृष्टीमुळे संत्र्यांसह इतर पिकांचे अभूतपूर्व असे नुकसान झाले असून संसदेच्या अधिवेशनात राज्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबद्दल केंद्राच्या कृषी मंत्रालयात बैठक घेऊन जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिले. विदर्भातील दोन दिवसीय दोऱ्यानंतर नागपूरात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नागपुरमधील संत्री, मोसंबी, सोयाबीन, कपाशी , धान, ज्वारी आणि अन्य पिकांचे झालेल्या नुकसानीची पाहणी शेतकर्यांच्या शेताच्या बांधावर जावून त्यांची कैफीयत एकून घेतली. तसेच त्यांना दिलासा देत वरील आश्वासन त्यांनी दिले.
१४ आणि १५ नोव्हेंबर असो दोन दिवस ते विदर्भातील शेतकऱ्यांच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी त्यांनी नागपूर जिल्हयातील काटोल विधानसभा मतदारसंघातील नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या शेताच्या बांधावर जात त्यांच्या नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केली.
विदर्भातील जी काही महत्वाची पिकं आहेत त्यांचे
नुकसान झाले आहे. त्यामध्ये फळबागांमध्ये संत्री, मोसंबी, धानाचे पीक, कपाशी, सोयाबीन, ज्वारी या पिकांचे नुकसान होत शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. यामध्ये संत्र्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या नुकसानीची आकडेवारी पेक्षा जास्त शेतकर्यांचे नुकसान झाले असून ती आकडेवारी मोठी आहे. अतिवृष्टीमुळे संत्र्यांवर गळ नावाचा रोग पडला आहे. यामुळे संत्री, मोसंबीची फळं गळून पडत आहेत. ६० ते ७० टक्के फळं गळून पडली आहेत. त्याचा आता काही उपयोग नाही. तो वेचून काढायला आणखी खर्च येत असल्याने संत्रा उत्पादक संकटात सापडल्याचे त्यांनी सांगितले.
मोसंबी आणि संत्र्यावर एक रोग येतो त्याला ड्रायबॅक म्हणतात. यामध्ये पाने सुकुन गळून पडतात आणि हाच रोग या पिकांवर आलेला आहे, असे सांगतानाच या सर्व उत्पादकांना काय आणि कशी मदत करता येईल अशी पाऊले टाकली जातील आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी सुद्धा बोलावून या नुकसानीला सामोरे जाताना यंत्रणा कशी उभारावी याची चर्चा या बैठकीत केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शेतकर्यांचे जे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामध्ये दोन भाग असून शेतकर्यांनी बॅंकचे कर्ज काढले आहे. पीक गेले आहे. मात्र कर्ज डोक्यावर तसेच राहिले आहे. त्यांना कर्जमाफी मिळणे आणि दुसरा भाग कर्जमाफीशिवाय समजा कर्जमाफी झाली आणि यंदाच्या वर्षातील पीक गेल्यानंतर पुढच्या वर्षीचं पीक घेण्यासंदर्भात भांडवली गुंतवणूक कुठुन करायची त्यासाठी केंद्र सरकारकडून,अर्थ मंत्रालयाकडून काही रक्कम मदतीसाठी शुन्य व्याजाने किंवा कमी व्याजाने, दिर्घ हप्त्याने देणं शक्य आहे का यादृष्टीने प्रयत्न करणार असून त्यासाठी अर्थ मंत्रालयातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान नुकसान झालेल्या पिकांमध्ये केंद्र सरकारनेच लक्ष घातले पाहिजे असा आमचा आग्रह राहिल असे त्यांनी सांगितले.
Marathi e-Batmya