प्लास्टीक पुर्नवापर आणि कचरा प्रश्नी कोकाकोलाची सरकारसोबत कामाची तयारी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्रा’साठी उद्योग जगत उत्सुक असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी

मुंबईत पुढील महिन्यात होणाऱ्या मॅग्नेटिक महाराष्ट्र या उद्योग परिषदेसाठी जागतिक समुहात अनुकुल वातावरण तयार करण्यात यश मिळत असून अनेक आघाडीच्या संस्था-समुहांनी या परिषदेत सहभागी होण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान राज्य सरकारसोबत अन्न प्रक्रिया, प्लास्टिकचा पुनर्वापर आणि कचरा व्यवस्थापन या क्षेत्रात राज्य सरकारसोबत काम करण्याची तयारी कोकाकोला समुहाने दाखविल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक परिषदेतील महाराष्ट्र पॅव्हिलियनमध्ये आज कोका कोलाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स क्विन्सी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी क्विन्सी यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. या चर्चेत कोका कोला समुहाने राज्य सरकारसोबत विविध क्षेत्रात सहयोग देण्याचे मान्य केले. तसेच भविष्यात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलर्सच्या टप्प्यावर नेण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांबाबत केपीएमजी या संस्थेसोबत विचार विमर्श करण्यात आला. त्यामध्ये नवीन अर्थ रचनेत रोजगार निर्मिती, ऑटोमेशन आणि पुर्न:कौशल्य या बाबींचा समावेश होता. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी आदी उपस्थित होते.

आज सकाळच्या सत्रात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील राज्याच्या शिष्टमंडळाने मॅग्नेटिक महाराष्ट्र उपक्रमाची विविध जागतिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना माहिती दिली. उद्योग उभारणीसाठी राज्यात उपलब्ध असलेल्या विविध सोयी-सुविधांची माहिती देतानाच गेल्या तीन वर्षात उद्योग सुलभतेसाठी केलेल्या प्रयत्नांबाबतही त्यांनी यावेळी सांगितले.

या प्रयत्नांमुळे औद्योगिक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे जगातील सर्वोत्तम केंद्र ठरल्याचे लक्षात आणून देतानाच मॅग्नेटिक महाराष्ट्र या उपक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रणही मुख्यमंत्र्यांनी उपस्थित प्रतिनिधींना दिले. जीएसटी, निश्चलनीकरण या सर्व कठोर आर्थिक सुधारणांमधून चांगला संदेश गेला असून पंतप्रधान मोदी यांनीही नवीन विचार जगासमोर ठेवला आहे. भारतातील गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या हातात पैसा आला तर निर्माण होणारी मागणी ही भारतासह जगाच्या अर्थव्यवस्थेलाही पोषक ठरणार आहे. भारतातील श्रीमंत आणि गरीबांमधील दरी मिटविण्यासाठी होत असलेल्या आर्थिक समावेशकतेच्या प्रयत्नांबाबतही यावेळी माहिती देण्यात आली. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासह स्टरलाईट, टाटा सन्स, व्होडाफोन, अपोलो टायर्स आदी आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रतिनिधीनी महाराष्ट्राच्या स्टॉलला भेट दिली.

About Editor

Check Also

ईपीएफओच्या व्याज दरात काहीही बदल नाही २०११-१२ मधील व्याजदर ८.२५% चालू वर्षातही

सेवानिवृत्ती निधी संस्था ईपीएफओ EPFO ​​ने सोमवारी (२ मार्च २०२६) कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी (EPF) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *