मुख्यमंत्र्यांपाठोपाठ आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा इशारा तिसरी लाट येवू नये म्हणून काळजी घ्यावी लागणार

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी

काही दिवसांपूर्वी राज्यात दहि हंडी उत्सवाला परवानगी संदर्भात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सणसुद, उत्सव थोडेसे बाजूला ठेवून कोरोनाची लाट थोपविण्याच्यादृष्टीने काळजी घेवू असे आवाहन दहिहंडी पथकांना केले. त्यास काही दिवसांचा अवधी लोटत नाही तोच आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पुन्हा इशारा देत देशातील दुसरी लाट ओसरली नसल्याने आगामी सणासुदीच्या दिवसात काळजी घेण्याची आवश्यकता असल्याची इशारा दिल्याने आगामी काळातील गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी निर्बंतातच साजरी करावी लागणार असून कोरोना विषयक नियम पाळणे बंधनकारक ठरणार आहे.

देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली नाही. सणासुदीच्या दिवसानंतर कोरोना रुग्णसंख्येत नेहमीच वाढ झाल्याचं दिसून येतं. त्यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातील सण जबाबदारीने साजरे करणं गरजेचे असून लसीकरणामुळे रोगाची तीव्रता कमी होते आणि रुग्णालयात दाखल करण्याची स्थिती ओढावत नाही. त्यामुळे लसीकरण झाल्यानंतरही मास्क आणि करोना नियमावलीचं पालन करणं आवश्यक असल्याचे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

मागील अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या ४० हजारांपेक्षा कमी होती. मात्र, गेल्या २४ तासांत पुन्हा रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. ही वाढ आधीच्या रुग्णसंख्येत तब्बल २३ टक्के आहे. बुधवारी देशात ४६ हजार १६४ करोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून ६०७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ३४ हजार १५९ जण बरे झाले आहेत. देशातील रिकव्हरी रेट ९७.६३ टक्क्यांवर आहे. विकली पॉझिटीव्हीटी रेट २.२ टक्क्यांवर असून डेली पॉझिटीव्हीटी रेट २.९८ टक्क्यांवर आहे. हा रेट गेल्या ३१ दिवसांपासून तीन टक्क्यापेक्षा खाली आहे.

सध्या देशात रोज येणाऱ्या करोना प्रकरणात केरळमधून ५१ टक्क्याहून अधिक रुग्ण आहेत. उत्सव काळात गर्दी टाळणं आवश्यक आहे. गर्दीमुळे करोना अधिक वेगाने पसरण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात अनिवार्य गर्दीच्या ठिकाणी दोन लस घेण्याची अट असावी असे इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे महासंचालक बलराम भार्गव यांनी मत व्यक्त केले.

त्यामुळे आगामी सणसुदीच्या दिवसात आता काळजी घेणे आवश्यक ठरणार असून सण सुदही साधेपणाने साजरे करावे लागणार आहेत.

About Editor

Check Also

प्रकाश आबिटकर यांची माहिती,कॉर्पोरेट क्षेत्र आणि सामाजिक संस्थांच्याधील समन्वयाने आरोग्य सेवा सक्षम दुर्गम व आदिवासी भागांमध्ये आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी (सीएसइार)चा प्रभावी वापर

शासन, कॉर्पोरेट क्षेत्र आणि सामाजिक संस्थांच्याधील समन्वयाने राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यात येणार असल्याचे आरोग्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *