मुंबई: प्रतिनिधी
कोविड विरोधी लढ्यात नर्स, डॉक्टरांचा स्टाफ कमी पडत असल्याने कोरोना यौध्द्यांची भरती राज्य सरकारकडून करण्यात आली. मात्र तरीही संख्या कमी पडत असल्याने कौशल्य विकास विभागाच्या अंतर्गत असलेल्या प्रशिक्षण केंद्रातून नर्सिंग, लॅब टेक्निशियन, डायलेसिस टेक्निशिअन आणि पॅरा मेडिकल कोर्स केलेल्या विद्यार्थ्यांना आता मुंबई. ठाणे येथील रूग्णालयात अप्रेंटीशिप देण्यात येत असल्याने हे विद्यार्थीही मागे राहीले नसल्याचे दिसून आले असून आतापर्यंत १५० विद्यार्थ्यांना रूग्णालयात रूजू करून घेण्यात येत असल्याची माहिती कौशल्य विकास विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
या विद्यार्थ्यांची पहिली तुकडी मुंबई शहरातील चार शासकिय, चार निमशासकिय आणि ७ खाजगी हॉस्पीटलमध्ये, मुंबई उपनगरातील ४ रूग्णालयांमध्ये , ठाणे येथील ६ रूग्णालयात, पालघर आणि रायगडमधील प्रत्येकी १ रूग्णालयात कोशल्यच्या विद्यार्थ्यांना अॅप्रेन्टीशिप देण्यात आली आहे.
सेंट जॉर्ज हॉस्पीटलमध्ये ६ विद्यार्थ्यांना रूजू करून घेण्याची कारवाई सुरु आहे. तर ठाणे येथील जनरल हॉस्पीटल येथे १५० विद्यार्थ्यांना नियुक्त करण्याची कारवाई सुरू आहे. याशिवाय मंत्रालयातील कौशल्य विकास विभागात स्टेनो व सेक्रेटरी असिस्टंट म्हणून ६ उमेदवारांना अप्रेन्टीस म्हणून नियुक्ती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय राज्यातील इतर रूग्णालयांमध्ये आणि कोर्सेसच्या अनुशंगाने सर्व विद्यार्थ्यांची माहिती सर्व कारखाने, कंपन्यांना उपल्बध करून देत असून त्यांच्या आवश्यकतेनुसार त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना अप्रेन्टीशिप देण्यात येत असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
Marathi e-Batmya