मराठी ई-बातम्या टीम
१० वी आणि १२ वीच्या परिक्षा ऑफलाईनच घेणार आहे. मात्र १५ फेब्रुवारीची परिस्थिती पाहुन योग्य निर्णय घेणार असल्याचे भाष्य शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी नुकतेच केले. मात्र विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परिक्षा घेण्याऐवजी ऑनलाईनच घ्या या मागणीसाठी विद्यार्थी संघटनेनेकडून धारावीतील मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन करण्यास सुरुवात केली. परंतु पोलिसांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याची माहिती पुढे येत आहे.
ऑनलाईन परिक्षा घेण्याच्या मुख्य प्रश्नी मुंबईबरोबरच नागपूर, औरंगाबाद व उस्मानाबाद येथे १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. शाळा ऑनलाईन असताना, परीक्षा ऑफलाईन का? असा सवाल आंदोलक विद्यार्थांकडून केला जात आहे. तर विद्यार्थ्यांना भडकवण्यामागे कोणी आहे का? याचा देखील शोध घेतला जात असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, ऑनलाईन परीक्षेच्या मागणीसाठी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर आक्रमकपणे उतरले असून, बसच्या काचा देखील फोडण्यात आल्या आहेत.
धारावीत मोठ्या संख्येने विद्यार्थी जमलेले आहेत. यंदा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्यावी अशी त्यांची मागणी आहे. ऑफलाईन परिक्षेचा निर्णय विद्यार्थ्यांना मान्य नसल्याने रस्त्यावर उतरल्याचे सांगण्यात येत असून शिक्षणमंत्र्यांनी परीक्षा ऑफलाईन घेण्याचे जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर देखील विद्यार्थ्यांकडून या विरोधात प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
यानंतर आज मुंबईत विविध भागातून विद्यार्थी धारावीत जमले व त्यांनी आंदोलनास सुरूवात केली. पोलीस प्रशासन या विद्यार्थ्यांना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र विद्यार्थ्यांची संख्या जास्त असून, विद्यार्थी ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नसल्याने, पोलिसांना बळाचा वापर करावा लागत आहे.
तर, दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होतील. विद्यार्थी संख्या बरीच जास्त असल्याने ऑनलाइन परीक्षा शक्य नाही. असं राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, परीक्षा घेत असताना आम्ही सर्व बाबींचा विचार करत आहोत. संघटनांनी मुलांना रस्त्यावर आणणं योग्य नाही. काही गोष्टी बोलायच्या असतील तर ते आमच्याशी चर्चा करू शकतात. आम्ही चर्चा करण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. त्यानुसार आम्ही शिक्षण तज्ज्ञांशी देखील चर्चा करू. विद्यार्थ्यांच्या काही सूचना असतील तर त्या ऐकण्यासाठी सरकार व शिक्षण विभाग तयार असल्याची तयारी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दाखविली आहे.
Marathi e-Batmya