मुंबईः प्रतिनिधी
मुसळधार पावसाचा फटका हा रेल्वे वाहतुकीला बसला असून कुर्ला स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक अर्ध्या तासापासून ठप्प झाली आहे. तसेच पावसामुळे कल्याणकडे जाणारी जलद मार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली आहे. मध्य रेल्वेवरील सायन, कुर्ला रेल्वे स्थानक तसेच हार्बर मार्गावरील कुर्ला-वडाळा स्थानकादरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे.
शनिवारी (३ ऑगस्ट) हार्बर मार्गावरील वाहतूक ही ठप्प झाली आहे. तसेच कुर्ला स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच कल्याणकडे जाणारी जलद मार्गावरील वाहतूक धिम्या मार्गावर वळवण्यात आली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक २० ते २५ मिनिटे उशिराने सुरू आहे. यामुळे ठाणे, डोंबिवली यासह अनेक स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे. ठाणे, मुलुंड रेल्वे स्थानकात पाणी साचले आहे. तर अंबरनाथ, कल्याणमध्ये रेल्वे रुळावर पाणी साचले आहे.
मुंबईसह ठाणे उपनगरांत आज मुसळधार पाऊस कोसळत आहे, त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. तसेच तिन्ही मार्गांवरची लोकल सेवाही संथ गतीनं सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यांतल्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. आज संपूर्ण ठाणे जिल्ह्यात रात्रीपासून पडणाऱ्या पावसाची तीव्रता लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा-कॉलेजला सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनीसुद्धा शक्यतो घराबाहेर पडू नये आणि सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
Marathi e-Batmya