जवळपास वर्षभरापासून राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी मराठा आंदोलक समर्थक मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत अनेकवेळा आंदोलन केले. तसेच मागील काही वर्षी नवी मुंबईत मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः विशेष शासन निर्णय जारी करत त्याची प्रत स्वतः मनोज जरांगे पाटील यांना देत आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा समाजाला पुन्हा मुंबईत यायची वेळ येणार नाही असे जाहिर केले होते. त्यानंतरही कालपासून मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण प्रश्नी आझाद मैदानावर आंदोलन सुरु केले. या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलनावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली.
प्रसारमाध्यमाशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, तुमच्या व लोकांच्या मनात जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं केवळ एकचं माणूस देऊ शकतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच या घडामोडींवर उत्तर देऊ शकतात अशी प्रतिक्रिया दिली.
त्यानंतर मराठा-ओबीसी वादाकडे कसे पाहता असे विचारले असता राज ठाकरे म्हणाले की, मी याचं उत्तर देऊ शकणार नाही. एकनाथ शिंदे तुमच्यासमोर येतील तेव्हा तुम्ही हे त्यांनाच विचारा, आरक्षणाबाबतची माझी भूमिका सर्वांना माहित आहे. ते आता सगळं जुनं झालं. परंतु सध्याच्या घटनांवर केवळ एकनाथ शिंदे हेच बोलू शकतात असे उत्तर दिले.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले म्हणाले की, मुंबईतील वाहतुक कोंडी, तुम्ही म्हणताय तसे लोकांना त्रास होतोय वगैरे गोष्टींवर शिंदे बोलू शकतात. कारण मागच्या वेळेस एकनाथ शिंदे हेच नवी मुंबईला गेले होते ना असा प्रतिप्रश्न करत त्यांनी नवी मुंबईत जाऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला असं सांगितलं जात होतं मग मराठा आंदोलक परत का आले या सर्व गोष्टींची उत्तर केवळं एकनाथ शिंदे देऊ शकतात असेही यावेळी सांगितले.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी करत म्हणाले की, त्यांनी आरक्षणाबाबतच्या आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. आंदोलकांना सन्मान द्या आमचा अपमान करू नका असे आवाहन केले.
Marathi e-Batmya