मुंबईः प्रतिनिधी
राज्य सरकारच्या सर्व विभागातील २५ टक्के पदे रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने आगामी २-३ वर्षात सरकारी सेवेतील चतुर्थश्रेणीची पदेच नष्ट होणार आहेत. त्यातच शिपाई प्रवर्गासाठी खाजगी संस्थेकडून मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येत असल्याने राज्य सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या खाजगीकरणाच्या विरोधात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालये आणि मुंबईत आझाद मैदानावर १९ सप्टेंबर २०१९ रोजी निदर्शने करणार असल्याची घोषणा राज्य सरकारी गट-ड कर्मचारी मध्यवर्ती महासंघाने एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली.
राज्य सरकारने १४ जानेवारी २०१६ रोजी शासन निर्णय प्रसिध्द करत चतुर्थश्रेणीतील २५ टक्के पदे कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दरवर्षी २५ टक्के पदे कमी होण्यास सुरुवात झाल्याने सरकारी सेवेतून चतुर्थश्रेणीची पदेच संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच सहकार व पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने अल्फाकॉम सर्व्हीसेस इंडिया या खाजगी कंपनीसोबत शिपाई पदासाठी काम करणारे माणसं पुरविण्याचा करार केला. त्यामुळे शासकिय सेवेत शिपाई पदावर काम करणारा वर्गच शिल्लक राहणार नसल्याची भीतीही या पत्रकाद्वारे व्यक्त केली.
तसेच अनुकंपातत्वावर आणि वारसा हक्काने लागणाऱ्या नोकऱ्यांवर गदा येणार आहे. त्यामुळे सरकारकडून शिपाई वर्गावर होणाऱ्या या अन्यायाच्या आणि खाजगीकरणाच्या विरोधात आझाद मैदानावर आणि राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे.
Marathi e-Batmya