कोरोनाकाळात मुंबई पालिकेतील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सुरज चव्हाण यांनी अटकेला तसेच सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) कोठडीला आव्हान दिले आहे. त्याची दखल घेऊन उच्च न्यायालयाने सर्व प्रतिवाध्यांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.
आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाणांना १७ जानेवारीला खिचडी घोटाळा प्रकरणी ईडीने अटक केली असून तेव्हापासून सुरज चव्हाण तुरुंगात आहेत. चव्हाण यांचा जामीन अर्ज गेल्या महिन्यात सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने फेटाळून लावला होता. दुसरीकडे, चव्हाण यांनी अटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आपली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा याचिकेतून केला आहे. याचिकेवर न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने याचिकेची दखल घेऊन सर्व प्रतिवादींना नोटीसा बजावल्या आणि भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.
काय आहे खिचडी घोटाळा
कोरोनाकाळात स्थलांतर करणाऱ्या गरीब कामगारांसाठी जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय तत्कालीन माविआ सरकारने घेतला. केंद्राने पाठिंबा दिल्यानंतर मुंबई मनपाच्या एकूण ५२ कंपन्यांना खिचडी देण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले. प्राथमिक चार महिन्याच्या काळात चार कोटी खिचडी वाटण्यात आल्याची माहिती महापालिकेने दिली. मात्र, या खिचडी वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला. त्यामध्ये आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांचे नाव समोर आले. कथित खिचडी घोटाळा प्रकरणात सूरज चव्हाण आणि अमोल किर्तीकरांची आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली. किर्तीकरांच्या खात्यात ५२ लाख तर चव्हाण यांच्या खात्यात ३७ लाख रुपये जमा झाल्याचे निदर्शनास आले. चौकशीत खात्यात जमा झालेल्या रक्कमेबाबत दोघांनाही विचारणा केली असता फोर्सवन नामक कंपनीचे कर्मचारी असल्याने त्यांना पगार म्हणून हे पैसे मिळाल्याचे सांगितले.
Marathi e-Batmya