ठाणेः प्रतिनिधी
ठाणे महानगर पालिकेने साफ सफाईसाठी नेमलेल्या ठेकेदारांनी कर्मचाऱ्यांच्या पीएफमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा केल्याचा प्रकार उघडकीस आणत सदर घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली.
या कंत्राटदारांनी पीएफ (भविष्य निर्वाह निधी) चे पैसे भरल्याच्या पावत्या जमा केल्याशिवाय त्यांना देयके दिली जाऊ नयेत, असा नियम असतानाही त्यांना देयके दिली असल्याने पालिकेतील अधिकारीही या भ्रष्टाचारात सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला.
या संदर्भात पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना पत्र दिले असून या पत्रानुसार, “ ठाणे महानगर पालिकेच्या अधिकार्यांनी एक अक्षम्य गुन्हा केला आहे. गोरगरीब कामगार रोजंदारीवर किंवा कंत्राटी पद्धतीने शहरातील साफसफाईचे काम करीत असतात. त्यांचे पीएफ (भविष्य निर्वाह निधी) आणि ग्रँच्यईटी भरणे संबधित कंत्राटदारांवर बंधनकारक करण्यात आलेले आहे. जोपर्यंत त्या संदर्भातील पावत्या ठामपामध्ये जमा केल्या जात नाहीत. तोपर्यंत सदर कंत्राटदाराला त्याचे देयक देऊ नये अशी मागणी त्यांनी केली.
ठामपामध्ये कोणत्याही भविष्य निर्वाह निधीची तपासणीच करण्यात आलेली नाही. तरीही ‘समझोत्याने कंत्राटदाराला त्याचे देयक अदा केलेले आहे. हा प्रकार म्हणजे मोठा भ्रष्टाचार असून सबंध प्रशासनच त्यामुळे अडचणीत येऊ शकते. त्यामुळे या प्रकाराची स्वतंत्ररित्या चौकशी करून गोरगरीब सफाई कर्मचार्यांचे पैसे खाणार्या माणसाला घरी बसवावे अशी मागणी त्यांनी केली.
Marathi e-Batmya