देवेंद्र फडणवीस यांचा सवाल, तेव्हा नैतिकता कुठल्या डब्यात बंद करुन ठेवली होती? विनाकारण नैतिकतेचा मुलामा चढवण्याचा प्रयत्न करा नका

महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. या निकालात अनेक ताशेरे शिंदे गटावर ओढण्यात आले आहेत. मात्र उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याने आम्ही जैसे थे परिस्थिती करत सुई मागे आणू शकत नाही असंही कोर्टाने म्हटलं आहे. एवढंच नाही तर आमदारांना अपात्र ठरवायचं का नाही? याचे पूर्ण अधिकार हे विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सगळ्या शंकांचं निरसन करून आमचं सरकार कायदेशीर ठरवलं आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनाही टोला लगावला आहे.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज मी उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद बघितली. नॉर्मली मी बघत नाही पण आज मी पत्रकार परिषद पाहिली. त्यामध्ये ते असं म्हणाले की मी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला. माझा त्यांना सवाल आहे की भारतीय जनता पक्षासोबत निवडून आलात आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेलात तेव्हा ही नैतिकता कुठल्या डब्यात बंद करुन ठेवली होती? याचं उत्तर द्या. खरं म्हणजे नैतिकतेचा विषय तुम्ही सांगू नये. कारण तुम्ही खुर्चीसाठी विचार सोडलात आणि एकनाथ शिंदेंनी विचारांकरता खुर्ची सोडली. एकनाथ शिंदे सत्तेत होते ते विरोधी पक्षासोबत आले. त्यामुळे नैतिकतेवर बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही.

उद्धवजी तुमच्या लक्षात आलं होतं की तुमच्याकडे संख्याबळ नाही. तुम्ही हरणार आहात. लोकं तुम्हाला सोडून गेले आहेत. त्या लाजेपोटी आणि भीतीपोटी राजीनामा दिलात. विनाकारण त्याला नैतिकतेचा मुलामा चढवण्याचा प्रयत्न करु नका. एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आज त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब हे सर्वोच्च न्यायालयाने केलं आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

About Editor

Check Also

मुंबई सेंट्र्ल रेल्वेस्थानकालगतच्या पुलाचे नामकरण राजमाता अहिल्यादेवी होळकर असे करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सभागृहात आश्वासन

विकासकामांची गुणवत्ता राखत कामे गतीने पूर्ण करण्यास राज्य शासनाचे प्रथम प्राधान्य आहे. त्याच पद्धतीने बृन्हमुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *