भाजपाच्या उमेदवारी माघारीवरून अजित पवार म्हणाले, वातावरण लक्षात घेता… ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा

मनसे प्रमुख राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेल्या आवाहनानंतर अखेर भाजपाने अंधेरी पूर्वमधील पोटनिवडणुकीमधून माघार घेतली. शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने उमेदवारी दिली. विशेष म्हणजे भाजपाने माघारीचा निर्णय घेण्याआधीच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उध्दव ठाकरे यांची कॅसेट जुनी झाली असल्याची टीका केली होती. आणि आज त्यांनीच उमेदवार माघारीची घोषणा केली. यापार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही या संदर्भात अकोल्यामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली.

भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार मुरजी पटेल यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून अखेर माघार घेतल्याची अधिकृत घोषणा बावनकुळे यांनी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, ऋतुजा लटके यांनी प्रचाराला सुरुवात केली होती. मात्र सर्वांनी आवाहन केल्याने भाजपाने हा निर्णय घेतला असावा. यापूर्वी नांदेड आणि पंढरपूर पोटनिवडणुकाही झाल्या. त्यावेळी भाजपाने उमेदवार दिला. मात्र यावेळेचं सर्व वातावरण लक्षात घेता. दिवाळी तोंडावर आहे हे पाहता. या सर्व धावपळीच्या काळामध्ये त्यांच्या विधवा पत्नीला उमेदवारी मिळाही होती. त्याही कामाला लागल्या होत्या. त्याही घरोघरी फिरत होत्या. सर्वांनी आवाहन केल्यामुळे कदाचित हा चांगला विचार त्यांनी (भाजपाने) केला असावा, अशी कोपरखळी त्यांनी लागावली.

भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी सी. टी. रवी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह प्रदेश सुकाणू समितीतील काही नेते बैठकीत सहभागी झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरही भाजपा नेत्यांनी चर्चा केल्यावर आणि दिल्लीत पक्षश्रेष्ठींची परवानगी घेतल्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पटेल यांची उमेदवारी मागे घेण्याची घोषणा केली. शिवसेनेतील फुटीनंतर ही निवडणूक अतिशय अटीतटीची होईल, अशी अपेक्षा होती. निवडणूक लढविणार असल्याने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आपल्याला मिळावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आणि शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह गोठविले गेले. ठाकरे व शिंदे गटाला निवडणुकीपुरती दोन स्वतंत्र पक्षनावे व चिन्हे मिळाली.

भाजपच्या दबावामुळे शिंदे गटाने केलेल्या या हालचालींमुळे जनमानसात नाराजीचे वातावरण निर्माण झाले व ठाकरे गट आक्रमक झाला. शिंदे गटाने ठाकरे गटाच्या उमेदवार ॠतुजा लटके यांना आपल्या बाजूने वळविण्याचे प्रयत्न फसल्यावर त्यांचा महापालिका सेवेचा राजीनामा तांत्रिक मुद्द्यावर आयुक्तांवर दबाव आणून मंजूर करणे लांबविण्याचे प्रयत्न झाले. त्यातही उच्च न्यायालयाने दणका दिल्याने युतीची पंचाईत झाली होती. या सर्व नाट्यानंतरही लटकेंनी ठाकरे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपाने माघार घेतली.

About Editor

Check Also

नाना पटोले यांची मागणी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या राज्य निवडणूक आयुक्त व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी

राज्यात नुकत्याच झालेल्या २९ महानगरपालिका निवडणुकांनी निवडणूक व्यवस्थेचा बुरखा पुर्णतः फाटलेला आहे. शहरातील अत्यल्प मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *