परभणी- पाथरीः प्रतिनिधी
पाच वर्षांत ‘त्या’ बॅंकेत कमिटीच्या मिटींगला गेलो नाही. माझा यत्किंचितही संबंध नाही. निवडणूक सुरु झाली की आलेच आदेश, नोटीस… असा टोला लगावत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीची नोटीस काढून त्यांची ९ तास चौकशी करण्यात आली. कायदा सर्वांना समान हवा. परंतु ज्या पद्धतीने राजकारण सुरु आहे हे योग्य नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केले.
राज्य शिखर बँकेतील कथित आर्थिक घोटाळ्यात समावेश असल्याने अजित पवार यांच्यासह अनेकांवर गुन्हे नोंद करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करताना त्यांनी वरील मत व्यक्त केले.
हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नसल्याने पीक विमा मिळत नाहीय…फडणवीस कधी देणार हमीभाव… कशाला शेतकर्यांना फसवताय…असा संतप्त सवाल त्यांनी पाथरीच्या जाहीर सभेत सरकारला केला.
मराठवाडयाला पाच वर्षांत शेतीसाठी या सरकारकडून काय मिळाले असा सवाल करत ते पुढे म्हणाले की, आदिलशाही, अकबर, टिपू यांची राज्य होती. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात भोसल्यांचे राज्य कधी कुणी म्हटलं होतं का त्यांच्या राज्यात रयतेचं राज्य म्हटलं गेलं होतं.
आमचं सरकार निवडून आणा चार महिन्यात तुमचा सातबारा कोरा करून दाखवतो, नाहीतर पवारांची अवलाद सांगणार नाही असे जबरदस्त आवाहन देत यापुढे राष्ट्रवादीच्या सभांमध्ये ‘शिवरायांचा भगवा’ आणि राष्ट्रवादीचा झेंडा असे दोन झेंडे राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
१८ रुपये पीक विमा चे पैसे शेतकरी ला दिले आहेत पीक विमा कंपन्या गडगंज झाल्या आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत बटण दाबताना शंभरवेळा विचार करा व आघाडीची सत्ता आणा असे आवाहन त्यांनी केले.
मीच ‘चालू मुख्यमंत्री’ राहणार हे सांगण्यासाठी महाजनादेश – मुंडे
आत्ताही मी चालू मुख्यमंत्री आहे आणि पुढेही मीच चालू मुख्यमंत्री राहणार हे सांगण्यासाठी महाजनादेश यात्रा मुख्यमंत्री काढत असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.
सत्तेत आल्यावर लगेच कर्जमाफी करतो असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिले होते. परंतु ही फसवी योजना निघाली. शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ झालेला नाही. फसवी कर्जमाफी जाहीर करणार्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली.
शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने सरकारने पुसलीय – खासदार डॉ. कोल्हे
प्रत्येक बाबतीत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकार करतंय. त्यांना शेतकऱ्यांच्या भावनेचं काहीही देणेघेणे नसल्याचा आरोप खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला.
१६ हजार भगिनींच्या कपाळावरचे कुंकु पुसले गेले आहे. मग मुख्यमंत्री कुणावर ३०२ चा गुन्हा कुणावर दाखल करायचा असा सवाल विचारत कामंच केली नाही म्हणून महाजनादेश यात्रेत पोलिस बंदोबस्त ठेवावा लागत असल्याचा टोला त्यांनी लगावला. मुख्यमंत्री एमबीए आहेत. त्यांच्या पदवीचा आदर करुन सांगतो आज ती पदवी म्हणजे ‘महाबोलबच्चन यात्रा’ झाली आहे अशी जोरदार टीकाही त्यांनी केली.
मानवतपासून पाथरीपर्यंत भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. दुसऱ्या टप्प्यातील शिवस्वराज्य यात्रेतील पहिली सभा आज परभणीतील पाथरी येथून सुरु झाली. पाथरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण आणि नवीन इमारतीचे उद्घाटन विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या हस्ते झाले.
या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार सतिश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार विजय भांबळे, प्रदेश सरचिटणीस अमोल मेटकरी, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला राठोड, राजेश वीटेकर,माजी आमदार अरविंद चव्हाण, माजी खासदार सुरेश जाधव,जिल्हा परिषद उपाध्यक्षा भावना नखाते, आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
Marathi e-Batmya