बारामती विधानसभा मतदारसंघात आज महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा उमेदवार युगेंद्र पवार यांनी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे कोणतंही शक्तिप्रदर्शन न करता उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, युगेंद्र पवार यांनी आज बारामती तहसील कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज भरला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते, कुटुंबिय आणि मित्र परिवार यावेळी उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर झालेल्या छोटे खानी सभेत शरद पवार म्हणाले की, युगेंद्र पवार यांचं शिक्षण परदेशात झालंय. त्यांच्या रूपात बारामतीत आम्ही उच्चशिक्षीत, पदवीधऱ उमेदवार दिलाय. बारामती नव्या नेतृत्वाचा स्वीकार करेल, अशी आशा आहे. युगेंद्र पवार या तरूण उमेदवाराचा अर्ज आम्ही भरला. जनतेशी बांधिलकी ठेवा, विनम्रता ठेवा असा सल्लाही युगेंद्र पवार यांना दिला.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेला विश्वास देतो की महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्रात जनतेच्या हिताची जपणूक करणारा, महत्त्वाचे प्रश्न बेरोजगारी, महागाई, शेतकरी, कामगार, दलित आदिवासी महिलांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न आमची आघाडी करेल, असा विश्वासही यावेळी दिला.
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा मी आढावा घेत आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने महाविकास आघाडीला प्रचंड प्रतिसाद दिला. त्याची नोंद अंतकरणात कायम ठेवली आहे. आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही सर्व जागा लढत आहोत. तिघांच्यात एकवाक्यता करण्याचा प्रयत्न करतोय. एकंदर जागांपैकी ९५ टक्के जागांवर एकमत झालं आहे. काही थोड्या जागा राहिल्या आहेत, त्यावर विचार करून निर्णय घेऊ. माझी खात्री आहे की जागा वाटपाची स्पष्टता एका दोन दिवसांत होईल. महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन करायचं आहे. महाराष्ट्राच्या जनतेचे अनेक प्रश्न आहेत. सरकारकडून ते सोडवले गेले नसल्याचा आरोपही महायुती सरकारवर केला.
शरद पवार पुढे म्हणाले की, महायुती सरकारची सत्ता अडीच वर्षांपासून आहे. त्यापूर्वी त्यांना कधी लाडकी बहीण आठवली नाही. लाडकी बहीण योजना चार महिन्यांपूर्वी आली. कारण लोकसभेत त्यांना मतदारांनी धडा शिकवला होता. त्यानंतर ही योजना आहे. त्यापूर्वी कधी त्यांना लाडकी बहिणीची आठवण झाली नाही अशी खोचक टीकाही यावेळी केली.
युगेंद्र पवार यांच्या उमेदवारीबाबत शरद पवार म्हणाले, बारामतीमधून युगेंद्र पवार या युवा नेत्यास आम्ही उमेदवारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत बारामतीने सुप्रिया सुळे यांना बहुमत दिले होते. आता युगेंद्र पवार विजयी होतील. बारामती मतदारांची मला जितकी माहिती आहे, तितकी इतर क्वचितच कोणाला असेल. मला महाराष्ट्रातील राजकारणात शक्ती देण्याचे काम बारामतीने दिले. आता या निवडणुकीत बारामतीकर युगेंद्र पवार याला मोठ्या मताधिक्याने विजयी करतील, अशी आशाही यावेळी व्यक्त केली.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, आम्हाला महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन करायचे आहे. महाराष्ट्राच्या जनतेचे अनेक प्रश्न आहेत. आज ज्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांच्याकडून हे प्रश्न सोडवले गेले नाहीत. अलीकडच्या काळात पक्षफुटी, पक्षांची मोडतोड करणे, सत्तेसाठी नको ती तडजोड करणे, विचार आणि कार्यक्रमाशी तडजोड करणे, हे ज्या घटकांनी महाराष्ट्रात केलंय, त्यांच्याविषयी आम्ही जनतेसमोर जाऊन भूमिका मांडणार असल्याचेही यावेळी सांगितले.
सर्वाधिक राजकीय अनुभव असलेले आजोबा माझ्या पाठिशी – युगेंद्र पवार
यावेळी युगेंद्र पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हणाले की, आपल्यासोबत शरद पवार, सुप्रिया सुळे खंबीरपणे उभे आहेत. तसंच, कुटुंब म्हणून आई-वडिलही उपस्थित आहेत. तसंच, संपूर्ण बारामतीकर सोबत असल्याचा विश्वासही यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
पुढे बोलताना युगेंद्र पवार म्हणाले की, तसंच, बोलण्यासाठी माझ्याकडे जास्त काही नाही. कारण मी लहाण असल्यापासून मी शरद पवार यांना पाहत आलो आहे. तसंच, शरद पवार माझा अर्ज भरण्यासाठी माझ्यासोबत आले त्याबद्दल मी आयुष्यभर ऋणी राहील असं मनोगतही यावेळी व्यक्त केले.
युगेंद्र पवार पुढे बोलताना म्हणाले की, बारामतीचं नाव शरद पवार यांनी जगभरात पोहचवलं. मी सुद्धा जोपर्यंत मी काम करतोय तोपर्यंत मी शरद पवार सारखंच काम करत राहीन. त्याचबरोबर तुमचा सेवक म्हणून मी कायम तुच्या सेवेत राहील असं आश्वासनही यावेळी दिलं. त्याचबरोबर येथे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावण्याचं काम करणार आहे. आव्हान असेल की नसेल याचा मी विचार केला नाही. परंतु, माझ्या पाठीशी शरद पवार आहेत इतकाच विचार मी करतो. दरम्यान, मी बारामती चारवेळा पिंजून काढली आहे. त्यामुळे मला इथ सगळी परिस्थिती माहिती आहे. जिथं कुणी पोहचत नाही तिथं आपण जाणार असल्याचंही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya