पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सामनातून केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी खासदार संजय राऊत यांचा “श्रीमान मोरारजी राऊत” असा उल्लेख करुन पलटवार केला.
आमदार ॲड आशिष शेलार यांनी एक्सवर एक पोस्ट टाकून या अग्रलेखाला प्रत्त्युतर देताना म्हणाले की, महाराष्ट्रात एखादा उद्योग व्यवसाय येणार किंवा नविन विकास प्रकल्प होणार असे कळताच कट कमिशन आणि राजकीय स्वार्थासाठी हातात विरोधाचा झेंडा घेऊन जे उतारतात, उद्योगांना महाराष्ट्रातून पळवून लावतात, त्याच पक्षाचे नेते संजय राऊत महाराष्ट्रातून उद्योग गेले म्हणून “हग्रलेख” लिहितात? अशी खोचक टीका केली.
आशिष शेलार पुढे म्हणाले की, आता विषय काढलाच आहे तर मग, संजय राऊत तुम्हाला उत्तर द्यावी लागतील… मुंबई सोडून एलएनटी का गेली? कुणाची युनियन होती? महिंद्रा कंपनी मुंबई सोडून अन्य राज्यात का गेली? कुणाची युनियन होती? खंबाटा, एएफएल लॉजिस्टीक यांनी का शटर डाऊन केली? या सगळयांना युनियन बनवून कुणी त्रास दिला? ही मुंबईतील काही मोजकी उदाहरणे, महाराष्ट्रातील गेल्या १५ वर्षातील उद्योग बंद झाले त्याचा हिशेब काढला तर मग पुण्याच्या बजाज पासून सगळया कारखान्यांमध्ये उबाठाचीच युनियन होती ना? असा सवालही यावेळी केला.
पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले की, वेदांत फॉस्कॉन, बारसूची ग्रीन रिफायनरी, वाढवण बंदर या प्रकल्पांना विरोध कोण करतेय ? आणि पुन्हा महाराष्ट्रातून प्रकल्प गेले म्हणून ओडताय? चोर तर चोर वरुन शिरजोर? असा सवाल करत मराठी कामगारांना उध्दस्त करणाऱ्या उबाठाचे हात मराठी माणसाच्या रक्ताने ही माखलेले आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढयात मराठी माणासावर गोळया झाडणाऱ्या स.का.पाटील, मोरारजी देसाई यांच्या काँग्रेसच्या मांडीवर तुम्ही बागडत आहात ना? अशी आठवण करून देत काँग्रसशी हात मिळवणी केलीत, तुमच्या हाताला मराठी माणसाचे रक्त लागलेले आहे. तुम्हाला इतिहास कधीच माफ करणार नाही असा इशाराही यावेळी दिला.
संजय राऊत यांच्यावर टीका करताना आशिष शेलार म्हणाले की, श्रीमान संजय राऊत तुमचे कसे झालेय सांगू का ? दुदैवाने ज्याला वेड लागते म्हणजे तुमच्या सारखा जो मनोरुग्ण असतो त्याला ना “आपण सोडून सगळं जग वेडं वाटत असतं” म्हणून तुम्ही मोरारजी राऊत आहात! अशी खोचक टीकाही यावेळी केला.
Marathi e-Batmya