राज्याच्या विधानसभा निवडणूकीचा कालावधी जसजसा जवळ येत चालला आहे तसतसे दोन्ही राष्ट्रवादींपैकी सर्वाधिक भंबेरी ही अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उडताना दिसत आहे. त्यातच अजित पवार यांच्यासोबत गेलेले अनेक सीनियर पवारांचे सहकारी आणि जे अजित पवार यांच्यासोबत गेले, ते सर्वजण आता पुन्हा परतीच्या वाटेवर असल्याचे संकेत देत आहेत. त्यामुळे अजित पवार यांची अडचण होताना दिसत असून तशी अप्रत्यक्ष म्हणा नाही तर प्रत्यक्ष म्हणा आज दस्तूरखुद्द कबुली अजित पवार यांनीच एके कार्यक्रमात दिली.
आमदार सुनिल शेळके हे अजित पवार समर्थक म्हणून ओळखले जातात. मात्र मध्यंतरी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सुनिल शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेटही घेतली होती. मात्र त्यावेळी सुनिल शेळके यांनी अजित पवार यांच्यासोबतच थांबणार असल्याचे जाहिर केले होते. या पार्श्वभूमीवर सुनिल शेळके यांच्या मतदारसंघात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले की, घरातील वडील माणूस वय झाल्यानंतर सगळी कामाची जबाबदारी पुढच्या पिढीकडे सोपवित धरा माझ्यासमोर काम करा शिका म्हणत त्या घरात बसतं. पण काही जणांना त्याचं काही वाटतच नाही. वय झालं तरी निवृत्ती घेत नाहीत, सगळ स्वतःकडेच ठेवत असल्याची खंत अजित पवार यांनी शरद पवार यांचे नाव घेता व्यक्त केली.
यापूर्वीही अजित पवार यांनी बारामतीतून निवडणूक न लढण्याचे संकेत देत यावेळी माझ्या पक्षाचा दुसरा उमेदवार असेल असे सांगत त्या उमेदवारासाठी आमच्या पक्षाचे नेते काम करतील असे सांगत बारामतीतून उमेदवारी अर्ज भरणार नसल्याचे संकेत दिले. यापूर्वी अजित पवार यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांना भाजपासोबत जाण्याचा पर्याय सुचवित एकत्र राहण्याचे आवाहन केले होते. मात्र शरद पवार यांनी त्यास कधीच दुजोरा दिला नाही.
आता त्यातच राज्यातील विधानसभा निवडणूकांचे पडघम वाजायला सुरुवात झाल्यानंतर अजित पवार यांच्या सोबत गेलेले अनेक आमदार विशेषतः माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे, मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या कन्येने तर यापूर्वीच शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय़ घेत राजकिय वेगळा मार्ग निवडला. त्यातच अजित पवार यांचे कट्टर विरोधक आणि दौंडचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनीही नुकतेच भाजपातून शरदचंद्र पवार पक्षात जाण्याची घोषणा केली आहे. याशिवाय नरहरी झिरवळ यांचे सुपुत्र ही शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. याशिवाय अजित पवार यांच्यासोबत गेलेले अॅ़ड माजिद मेनन हे ही पुन्हा शरद पवार यांच्याकडे परतले असून आता विधान परिषदेचे माजी उपसभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजपामधील रणजीतसिंह मोहिते पाटील यांनीही आता शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीतील विद्यमान आमदार आणि माजी पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा परतीचा मार्ग स्विकारल्याने शरद पवार यांच्या पक्षाचे वजन भलतेच वाढत चालले आहे. त्याचबरोबर शरद पवार यांचे वय ८६ च्या घरात असूनही राज्यातील अनेक भागात आणि तेथील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात अजित पवार यांच्यापेक्षा शरद पवार हे अति उजवे आहेत.
त्यातच मागील काही सभांमध्ये शरद पवार यांनी राज्यातील भाजपा प्रणित महायुतीचे सरकार बदलायचे असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे शिवसेना उबाठा, काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीमध्ये भाजपा आणि अजित पवार यांचा पक्ष सोडून परतणाऱ्यांची संख्या सर्वाधिक दिसून येत आहे.
त्यातच विविध राजकिय पक्षांकडून त्यांच्या बालेकिल्ल्यात सर्व्हे करण्यात येत असून अजित पवार गटाच्या आणि भाजपा आमदारांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार यांच्या विषयी आणि महाविकास आघाडीच्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान भाजपा मात्र या प्रमुख विरोधी पक्षांशी लढताना मात्र शरद पवार, शिवसेना उबाठाचे उद्धव ठाकरे यांना जाणीवपूर्वक प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.
Marathi e-Batmya