मुंबईः प्रतिनिधी
राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थानापन्न होवून ३-४ महिने झाले नाही तोच भाजपने या सरकारच्या धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. मात्र २२ फेब्रुवारी रोजी चौथा शनिवार असल्याने या दिवशी सर्व कार्यालये बंद असतात. त्यामुळे हे नियोजित आंदोलन २५ फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व तहसील कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करत जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिली.
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या, प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, सह मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये , प्रवक्ते गणेश हाके , विश्वास पाठक आदी या प्रसंगी उपस्थित होते.
यावेळी राज्य परिषदेच्या अधिवेशनातील कामकाजाची माहिती दिली. महाआघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर समाजाच्या प्रत्येक घटकाची फसवणूक केली आहे. या सरकारच्या काळात गुन्हेगारांना धाक न उरल्याने महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. यांच्या विरोधात धरणे आंदोलनाद्वारे राज्यभरात जनजागृती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाआघाडी सरकार विसंवादाने कोसळेल, हे सरकार पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्न करणार नाही. हे सरकार कोसळले तर भाजपा सरकार स्थापण्याचा प्रयत्न करणार नसल्याचेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले.
Marathi e-Batmya