नावाअगोदर चौकीदार लावणा-या चोरांपासून सावधानतेचा इशारा पोलिसांकडून त्याची चारित्र्यतपासणी करून घेण्याचे काँग्रेसचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी

अनेक चोर, गुन्हेगार हे स्वतःला चौकीदार म्हणवू लागल्याने देशात अभूतपूर्व असुरक्षिततेचे वातावरण तयार झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रामाणिकपणे काम करणा-या पहारेक-यांकडेही लोक संशयाने पाहू लागल्यामुळे प्रामणिक पहारेक-यांची मनस्थिती ही भांबावल्यासारखी झाली आहे. जनतेने कोणालाही पहारेक-याची नोकरी देण्याआधी पोलिसांकडून त्याची चारित्र्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे.

या संदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, देशात चौकीदार म्हणून काम करणा-यांपेक्षा स्वतःच्या नावा अगोदर चौकीदार लिहिणा-यांपासून प्रचंड धोका आहे. बहुतांश चोर मंडळी जनतेचा विश्वास संपादन करण्याकरिता अशा कार्यपद्धतीचा वापर करत असल्याने त्यांना नोकरी दिल्यास चोरी अथवा गुन्हा घडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे गृहनिर्माण संस्था, व्यापारी संकुले, घर, दुकाने यांच्या सुरक्षेसाठी चौकीदार नेमताना काळजी घ्यावी असे सावंत म्हणाले. देशातील पोलीस प्रशासनही अशा पद्धतीने कोणालाही नोकरीला ठेवताना त्याची चारित्र्य पडताळणी करून घ्यावी असे आवाहन करत असते. आतातर शिक्षकांपासून इतर अनेकांना नोकरी देताना पोलीस तपासणीची अट घातलेली आहे. देशातील प्रामाणिक चौकीदार पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र घेण्याकरिता निश्चितच आनंदाने तयार होतील. स्वतःच्या नावाअगोदर चौकीदार लावणारे भामटे मात्र या तपासणीपासून पळ काढतील असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांचे पदोन्नतीमधील आरक्षणासंदर्भात पत्राद्वारे राष्ट्रपतींकडे मागणी सरकारी नोकरीतील पदोन्नतीमधील आरक्षणाची अंमलबजावणी करा

पदोन्नतीमध्ये आरक्षण हा केवळ धोरणाचा विषय नाही तर तो एक घटनात्मक वचन आहे ज्याचा उद्देश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *