बिहार-मुंबई: प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे कार्टून व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड केल्याप्रकरणी नौदलातील निवृत्त अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी केलेल्या कथित मारहाणप्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून राज्यपुरस्कृत दहशवाद थांबविण्याचे आवाहन करत हे निषाधार्ह असल्याची टीका त्यांनी बिहारमध्ये जावून केली.
बिहार विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांची बिहारच्या प्रभारी पदी भाजपाने नियुक्ती केली. त्यामुळे ते सध्या बिहारमधील भोजपुर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात राज्यपुरस्कृत दहशतवादाची अवस्था निर्माण झाली आहे. मी कालच ट्विटद्वारे उद्धव ठाकरेंना हा गुंडाराज थांबवण्याचे आवाहन केलं आहे. निवृत्त नौदल अधिकाऱ्याला अशा प्रकारे मारहाण करणं आणि माध्यमांनी दबाव बनवल्यानंतर ६ लोकांना अटक करणं आणि दहाच मिनिटांत सोडून देणं हे चुकीचं आहे. जर अशा प्रकारे गोष्टी होत असतील तर अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात यापूर्वी कधीही झालं नव्हतं.
महाराष्ट्रात खऱचं काश्मीरसारखं वातावरण होत आहे का? या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र हे खूपच पुढारलेलं राज्य आहे. तिथली जनता सुज्ञ आहे, त्यामुळे तिथे काश्मीरसारखी वैगरे स्थिती निर्माण होणार नाही.
सामना हे शिवसेनेचं वृत्तपत्र असून यातून शिवसेनेचं म्हणणं मांडलं जातं. शिवसेनेला जर असं वाटत असेल की कंगना पाण्यात राहून मगरीशी वैर घेत आहे तर हा शिवसेनेचा अहंकार बोलत आहे. लोकांना अहंकार आव़डत नाही. जेव्हा सत्ता अहंकारी होते, तेव्हा तिचं पतन होतं आणि राज्यात सध्या तेच दिसत असल्याची टीका त्यांनी केली.
Marathi e-Batmya