मुंबईः प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमुळे भाजप महायुती २२० पेक्षा अधिक जागा जिंकेल असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला राज्याच्या प्रभारी आणि राष्ट्रीय महामंत्री सरोज पांडे, प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या, सरचिटणीस आणि महाजनादेश यात्रा प्रमुख आ.सुजितसिंह ठाकूर, माध्यम विभाग प्रमुख केशव उपाध्ये, प्रवक्ते अतुल शाह आदी उपस्थित होते.
आपण गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांचा हिशोब मतदारांना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा काढली होती. या यात्रेला राज्यातील जनतेने अभूतपूर्व प्रतिसाद दिला. या यात्रेने ३९९९ किलोमीटर एवढा प्रवास केला. विधानसभेच्या १४२ मतदारसंघातून महाजनादेश यात्रेने प्रवास केला. यात्रेत झालेल्या सभांना मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे भाजप महायुती विधानसभा निवडणुकीत २२० पेक्षा अधिक जागा जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्य सरकारने पाच वर्षांत केलेल्या कामाचा हिशोब या यात्रेत मतदारांपुढे ठेवण्यात आला. तसेच राज्य सरकारच्या कारभाराबाबत सूचनाही मागविण्यात आल्या होत्या. या यात्रेत १६० पेक्षा अधिक जाहीर सभा झाल्या. या यात्रेला विशेषतः महिला आणि मुस्लीम समाजाकडून मोठा पाठिंबा मिळाला. औरंगाबाद, पुणे, इचलकरंजी येथे झालेल्या रोड शो ला प्रचंड प्रतिसाद मिळाला. विदर्भ, मराठवाड्यातून यात्रा जात असताना पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी सुमारे साडे तीन कोटी एवढे अर्थसाह्य प्राप्त झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
भाजपच्या २० हजार शक्ती केंद्र प्रमुखांचे राज्यभर मेळावे घेण्यात येणार आहेत. २६ सप्टेंबर पासून हे मेळावे सुरू होतील.१० ऑक्टोबर पर्यंत हे मेळावे होतील, अशी माहितीही त्यांनी दिली.
Marathi e-Batmya