अंधभक्त आणि श्रद्धा यातील फरकच दुर्दैवाने उद्धव ठाकरेंना समजत नाही. बाळासाहेबांप्रती लाखो शिवसैनिकांची, सर्वसामान्य जनतेची श्रद्धा होती. ते अंधभक्त नव्हते. आजही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गरीबाच्या कल्याणाकरीता करत असलेली कामे व विकासकामे यामुळे देशातील जनतेच्या श्रद्धा मोदींच्या प्रती आहेत. तुम्ही डोळ्याला झापड बांधली असल्यामुळे श्रद्धा तुम्हाला अंधभक्तासारखी दिसून येते, असा खरमरीत टोला भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
भाजपाचे प्रविण दरेकर हे आज एका लग्नानिमित्त महाड येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टिकेला प्रत्युत्तर देताना प्रविण दरेकर म्हणाले की, उद्धव ठाकरे त्यांचा पक्ष रस्त्यावर आलाय याची त्यांना विस्मृती झालीय. रस्त्यावरचे कार्यकर्ते, जनतेला भेटला असतात तर आज भक्कमपणे आदरणीय बाळासाहेबांनी कष्टाने उभी केलेली शिवसेना आपल्याला टिकवता आली असती. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रेम करणारी लोकं अंधभक्त आहेत असे म्हणता. तुम्हाला ते अंधभक्त वाटताहेत परंतु त्यांची श्रद्धा मोदींच्याप्रती असल्याचेही सांगितले.
पुढे बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, तसेच तोडा फोडा आणि राज्य करा अशा प्रकारचे बोलत असताना अडीच वर्षाच्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्यासह माझ्यावर उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या माध्यमातून काय-काय कांड केले हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे. सत्तेचा दुरुपयोग करण्याचा आणि भाजपाच्या नेत्यांनाही अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलात हे उद्धव ठाकरे विसरले असल्याचा उपरोधिक टोलाही लागवला.
पंतप्रधान मोदी जुमलेबाज आहेत या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा समाचार घेताना प्रविण दरेकर म्हणाले की, पंतप्रधान मोदी जुमलेबाज आहेत की त्यांच्या गॅरंटीवर देशवासियांचा विश्वास आहे. घोडा मैदान आता लांब नाही. येणाऱ्या लोकसभेत दिसून येणार आहे. जो-जो शब्द या देशातील सर्वसामान्य माणसाने दिला तो मोदींनी पूर्ण केला आहे. गरिबांच्या कल्याणासाठी गरीब कल्याण अन्नधान्य योजना आणली. आज एकही गरीब उपाशी राहत नाही. महिलांसाठी अनेक प्रकारच्या योजना आणल्या. शेतकरी, युवा आणि महिला वर्गाची विशेष काळजी घेणारे पंतप्रधान आहेत जुमलेबाज नाहीत. केंद्र-राज्याकडून शेतकऱ्यांना ६-६ हजार रुपये खात्यात जात आहेत. शेतकऱ्यांना दिलासा दिला गेलाय.
प्रविण दरेकर पुढे बोलताना म्हणाले की, उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांनी केवळ टीका टीपणण्या करण्यापेक्षा पक्ष, संघटन मजबूत करावे. आलेल्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी रचना उभी करा. केवळ भाषणे देऊन, भावनिक होऊन निवडणुका जिंकता येत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस दिवसरात्र विकासासाठी झगडत आहेत. अशावेळी केवळ तुमचे भाषण, चार शिव्या घालणे, भावनिक वातावरण करून तुम्हाला तग धरता येणार नाही.
Marathi e-Batmya