मुंबई : प्रतिनिधी
काँग्रेसने मागणी केल्याप्रमाणे तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेसने देत लातूर आणि परभणीच्या एका जागेची अदलाबदल करत नाशिक, सिंधुदुर्ग आणि वर्धा, अमरावती जागेवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विधान परिषदेच्या जागेसाठी आघाडी करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष नवाब मलिक यांनी दिली.
बँलार्ड पियर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यभरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आघाडीबाबत चर्चा होती. दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्र येवून यावर तोडगा काढण्यात आला. दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडी व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रफुल्ल पटेल,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस पक्षातर्फ अशोक गेहलोत,प्रभारी मोहन प्रकाश,प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यात चर्चा होवून निर्णय घेण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यामध्ये तीन-तीन जागा लढवण्याचा निर्णय झाला आहे. राष्ट्रवादीच्या वाटयाला उस्मानाबाद-बीड-लातूर, नाशिक, कोकण या तर काँग्रेसला अमरावती, वर्धा, परभणी या जागा देण्यात आल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून रमेश कराड ( लातूर), शिवाजी सहाणे ( नाशिक), अनिकेत तटकरे ( कोकण) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेसकडून इंद्रकुमार बालमुकुंद सराफ – वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर अनिल माधोगडिया – अमरावती, सुरेश देशमुख – परभणी-हिंगोली यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. २८ जूनला लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणूका राज्यात होत असून पलूसमध्ये पतंगराव कदम यांच्या निधनामुळे जागा रिक्त झाली ती जागा काँग्रेस लढणार आहे. राष्ट्रवादीने त्याठिकाणी पाठिंबा दिला आहे. पालघर, गोंदियाबाबतही चर्चा झाली असून भंडारा-गोंदिया ही जागा राष्ट्रवादी लढणार आहे तर पालघरची जागा काँग्रेस लढणार आहे. यावर दोन्ही पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ७ वे राष्ट्रीय संमेलन ९ -१० जून रोजी पुणे येथे आयोजित केले असून याबाबतची अधिक माहिती येत्या काळात दिली जाईल अशी माहितीही नवाब मलिक यांनी दिली.