सर्वसामान्यांना न परवडणारे उज्ज्वला गॅस सिंलेडर मोदींना परत करणार महिला प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांची माहिती

मराठी ई-बातम्या टीम

अच्छे दिनचे स्वप्न दाखवणा-या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुष्कील केले आहे. इंधन व गॅस दरवाढीमुळे महागाई प्रंचड प्रमाणात वाढल्याने महिलांचे किचन बजेट कोलमडले आहे. उज्ज्वला गॅसची सब्सिडी कमी केल्याने गरीब महिलांना गॅस सोडून पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महिला काँग्रेसच्या वतीने रविवारी राज्यातील सर्व जिल्ह्यात आंदोलन करण्यात येणार असून उज्ज्वला योजनेचे गॅस सिलेंडर परत करून मोदी सरकारचा निषेध केला जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांनी दिली आहे.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना सव्वालाखे यांनी केंद्र सरकारवर सडकून केली. त्या म्हणाल्या की, महागाई वाढवून केंद्र सरकारने महिलांच्या संक्रांतीच्या उत्साहावर विरजण टाकण्याचे केले आहे. इंधन दरवाढीमुळे जीवनाश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. पंतप्रधान मोदींनी मोठा गाजावाजा करून महिलांना उज्ज्वला योजनेमार्फत मोफत गॅस देण्याची घोषणा केली. मात्र आता गॅस सिलेंडरच्या किंमती प्रचंड वाढल्याने महिलांना गॅस सिलेंडर घेणे परवडत नाही. उज्ज्वला योजनेच्या बहुतांश लाभार्थ्यांनी आता सिलेंडर अडगळीत टाकले असून त्या महिला पुन्हा चुलीवर स्वयंपाक करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने हे सिलवेंडर पंतप्रधान मोदींना पाठवून या दरवाढीचा निषेध करण्यात येणार आहे. रविवारी राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयी महिला हे आंदोलन करणार आहेत. महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे या पुणे येथे आंदोलन करणार आहेत.

राज्यातील सर्व जिल्हा काँग्रेस कमिट्यांमध्ये एक महिलेला कार्याध्यक्ष म्हणून नियुक्त करण्याची घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली या बद्दल महिला काँग्रेसच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. संध्याताई सव्वालाखे यांची महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली त्याला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या एक वर्षाच्या काळात महिला काँग्रेसच्या वतीने महागाई विरोधात राज्यभरात आंदोलने करण्यात आली. पूरग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात मदतकार्य करण्यात आले. मुलींसाठी कराटे व स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. लीगल सेल मार्फत कोरोना काळात कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करणा-या महिलांना कायदेशीर मदत दिली. तसेच शक्ती कायदा आणण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केल्याचे त्यांनी सांगितले.

तृतीयपंथी सेलच्या अध्यक्षपदी अॅड. पवन यादव यांची नियुक्ती

समाजात दुर्लक्षित तृतीयपंथीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अंतर्गत तृतीयपंथी सेलची स्थापना करण्यात आली असून या सेलच्या अध्यक्षपदी अॅड. पवन यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पवन या कायद्याच्या पदवीधर असून मुंबई न्यायालयात वकिली करतात तसेच सारथी फाऊंडेशनच्या माध्यमातून त्या तृतीयपंथीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत असतात.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी पोर्टलची निर्मिती

मुंबईमध्ये नोकरी, व्यवसाय निमित्ताने बाहेरून मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. त्यांच्याकरिता मोठ्या प्रमाणावर घरांची आवश्यकता असल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *