मुंबई: प्रतिनिधी
केंद्राकडे महाराष्ट्राचे ४२ हजार कोटी पडून आहेत. ते पैसे द्या म्हणून मागणी करतोय तर ते दिले जात नाहीत. ८० ट्रेन मागितले तर ३० ट्रेन दिल्या जातात. एक तास आधी ट्रेन उपलब्ध असल्याचे रेल्वेकडून सांगत नुसता गोंधळ निर्माणण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप शिवसेना नेते अनिल परब करत राज्याच्या हक्काचे पैसे न केंद्र सरकार न देता PPE KIT आणि N-95 मास्कचे पैसे मागत असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट त्यांनी केला.
राज्य सरकारही या सर्वांचे पैसे केंद्राला देणार असून केंद्र सरकारने कोणतीही गोष्ट फुकट महाराष्ट्र सरकारला दिलेली नसल्याचे त्यांनी सांगितले.
शिवालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्याला १७५० कोटी रूपयांचे गहू मिळालेले नाहीत. १२२ कोटी रूपयांचा स्थलांतरीत मजुरांचा निधी देखील अद्याप मिळालेला नाही. ६८ कोटी रुपयांचा ट्रेन चा खर्च स्थलांतरित मजुरांसाठी महाराष्ट्र सरकारने आतापर्यत केलेला आहे. मात्र एका ट्रेनला ५० कोटी रूपयांचा निधी मिळतो कसा ? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित करत महाराष्ट्राला श्रमिक ट्रेन मिळत नाहीत. एका तासाच्या अवधीत ट्रेन ची वेळ सांगतात. जाणीवपूर्वक प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण करतात. असे करून सरकारला बदनाम करण्याचे काम चालू असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
केंद्राकडून राज्याला १९,००० कोटी रुपये मिळाल्याचे बोलले जाते. पण प्रत्यक्षात
१८,२७९ कोटी हक्काचे पैसे महाराष्ट्राला अजून मिळालेले नसल्याचा खुलासा करत स्थलांतरीत मजूरांना पोहचविण्यासाठी एसटी बसेसचा वापर करण्यात आला. मात्र त्याचे पैसेही अद्याप दिले गेले नसल्याचे त्यांनी सांगितले.
कायद्यात बसणारे पैसे तरी महाराष्ट्र सरकारला मिळाले पाहिजेत. महाराष्ट्राचे केंद्राकडे ४२ हजार कोटी थकीत आहेत ते तरी किमान मिळावेत अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोरोनाला रोखण्याच्या अनुषंगाने भारतात जर कुठे उत्तम काम झालं असेल तर ते मुंबई आणि महाराष्ट्रात झालेल आहे. WHO ने बोलले होते की १.५ लाख केसेस होतील. परंतु आमच्या अंदाजाने फक्त ६० हजार केसेस असतील हे महाराष्ट्र सरकारचे उत्तम काम असल्याचे स्पष्ट केले.
तर काँग्रेसचे प्रदेसाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, विरोधी पक्षांकडून आम्ही सहकार्याची अपेक्षा केली होती. परंतु सरकारला बदनाम करायचे काम त्यांच्याकडून होत आहे. आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करू आणि जनतेला कोरोनाच्या संकटातून मुक्त करणार आहोत. विरोधकांकडून सहकार्य करायच ऐवजी समाजात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला.
Marathi e-Batmya