वीजपुरवठा खंडित झाला? मिस कॉल द्या किंवा ‘एसएमएस’ पाठवा ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांचे महावितरण विभागाला आदेश

मुंबई: प्रतिनिधी
वीजग्राहकांना जलद व विश्वासार्ह सेवा देण्यास कटिबध्द असलेल्या महावितरणने वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदविण्यासाठी मोबाईलद्वारे मिस्ड कॉल व ‘एसएमएस’ अशी सहज सुविधा वीजग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात २२ मार्च ते ३ मे २०२० पर्यंत ‘लॉकडाऊन’ जाहीर झालेला आहे. त्यामुळे वीजग्राहकांना घरबसल्या वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदविता यावी यासाठी सहज सोपी सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणला दिले. त्यानुसार ही सुविधा आजपासून महावितरणच्या वीजग्राहकांसाठी राज्यभरात सुरु होत आहे.
वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार मिस्ड कॉलद्वारे करण्यासाठी वीजग्राहकांनी त्यांच्या ग्राहक क्रमांकासोबत स्वतःच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. अशा नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून महावितरणच्या 022-41078500 या क्रमांकावर वीजग्राहकांना मिस्ड कॉल द्यावा लागेल. मोबाईलवरून आलेल्या मिस्ड कॉलच्या आधारे संगणक प्रणालीद्वारे ग्राहक क्रमांकाचा शोध घेतला जाईल व तक्रार प्राप्त झाल्याचा ‘एसएमएस’ संबंधीत ग्राहकांना पाठविला जाईल.
मिस्ड कॉल किंवा अन्य ‘एसएमएस’ सेवांसाठी ज्या वीजग्राहकांनी ग्राहक क्रमांकासोबत अद्यापही स्वतःच्या मोबाईल क्रमांकांची महावितरणकडे नोंदणी केलेली नाही, अशा ग्राहकांनी नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रंमाकावरून MREG<sapce><Consumer Number> हा ‘एसएमएस’ 9930399303 या मोबाईल क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची २४ तासांमध्ये महावितरणकडे नोंदणी केली जाईल.
‘एसएमएस’द्वारे वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार करण्यासाठी ग्राहक क्रमांकासोबत मोबाईल क्रमांकाची महावितरणकडे नोंदणी असणे आवश्यक नाही. कोणत्याही मोबाईल क्रमांकावरून ‘एसएमएस’द्वारे तक्रार नोंदविता येईल. मात्र १२ अंकी ग्राहक क्रमांक अचूक देणे आवश्यक आहे. ग्राहकांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावरून NOPOWER<space><Consumer Number> हा ‘एसएमएस’ महावितरणच्या 9930399303 या मोबाईल क्रमांकावर पाठविल्यास तक्रार नोंदविली जाईल. तसा ‘एसएमएस’ वीजग्राहकांना पाठविण्यात येईल. मात्र ग्राहकाने दिलेला ग्राहक क्रमांक चुकीचा किंवा अवैध असल्यास तक्रार स्वीकारली जाणार नाही.
मिस्ड कॉल किंवा ‘एसएमएस’ या दोन्ही नव्या सुविधांसह महावितरणची www.mahadiscom.in वेबसाईट, मोबाईल अॅप तसेच २४X७ सुरु असलेल्या कॉल सेंटरच्या 18001023435 किंवा 18002333435 किंवा 1912 या टोल फ्री क्रमांकावर वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार करण्याची सोय पूर्वीप्रमाणेच उपलब्ध राहणार आहे.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, खासगी व धर्मादाय रुग्णालयांना शासकीय आरोग्य योजना राबविणे बंधनकारक विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान दिली माहिती

राज्यातील खासगी व धर्मादाय रुग्णालयांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची अंमलबजावणी करणे बंधनकारक असल्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *