मुंबईः प्रतिनिधी
कालची घटना अत्यंत दुर्दैवी असून यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांना मुख्यमंत्र्यांनी काही लाखांची मदत जाहीर केली. परंतु या रकमेने काही होत नाही. ज्यांचा मृत्यु झाला त्यांची लहान मुलं आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील जबाबदार व्यक्तीला सरकारी नोकरीत तातडीने रुजू करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केली.
सीएसएमटी येथे घडलेल्या घटनास्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, यांनी भेट दिली. शिवाय रुग्णालयात जावून जखमींची विचारपूसही केली.
या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झालं होत, त्यानंतरही घटना घडली. याचा अर्थ स्ट्रक्चरल ऑडिटमध्येही भ्रष्टाचार होऊ शकतं हे पहिल्यांदा कळलं आहे. ऑडिट करताना वरवर काम केलं गेलं. त्यामुळे ही घटना घडल्याचा आरोपही त्यांनी केला.
जी टी हॉस्पीटलच्या महिला कर्मचाऱ्यांचा या घटनेत मृत्यु झाला आहे. ज्यावेळी ही दुर्घटना झाली त्यावेळी पालिका आणि रेल्वे विभागाने टोलवाटोलवी केली. लोकांचे प्रश्न सोडवा टोलवाटोलवी करू नका, भुयारी मार्ग निर्माण करा ज्यामुळे पुन्हा अशा घटना घडणार नाही असेही ते म्हणाले.
मुंबई महानगरपालिकेत युतीचे सरकार आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेला याचा जाब विचारला पाहिजे. तकलादूपणा बंद करा. ऑडिट फेल झालं ही बाब गंभीर आहे. सरकारचे कामाकडे लक्ष नाही असा थेट आरोपही त्यांनी केला.
शिवसेना पक्षप्रमुख युती करण्यात गर्क आहेत. ते सत्ता मिळवण्यासाठी मग्न आहेत. म्हणून इथे यायला त्यांच्याकडे वेळ नाही. खरंतर त्यांना मुंबईची चिंता कधीच नव्हती. असा टोला लगावतानाच मुंबईचे वाटोळे शिवसेनेने केल्याची जोरदार टीकाही त्यांनी केली.
Marathi e-Batmya