राज्यातील विधानसभा निवडणूकीत अपेक्षा जास्त बहुमत मिळवित राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर विधानसभेच्या अध्यक्ष पदी राहुल नार्वेकर यांची रितसर निवडही करण्यात आली. या निवडीनंतर सत्ताधारी पक्षाकडून मांडण्यात आलेल्या नार्वेकरांच्या अभिनंदन पर ठरावावर बोलताना सासऱ्याच्या मुद्यावरून जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात टोलेबाजी आणि काढलेले चिमटे चांगलेच रंगल्याचे पाह्यला मिळाले.
राहुल नार्वेकर यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर मांडण्यात आलेल्या अभिनंदनपर प्रस्तावावर सर्वात आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भाषण झाली.
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील म्हणाले की, आज तिघांची भाषणं झाली. पहिल्या भाषणापेक्षा दुसरं भाषणच मुख्यमंत्र्यांचं भाषण आहे की काय असा वाटायला लागले होते. प्रदिर्घ असे मार्गदर्शन पर भाषण आम्हाला लाभल्याचा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.
पुढे बोलताना जंयत पाटील म्हणाले की, राहुल नार्वेकर यांनी वास्तविक पाहता मंत्री व्हायला हवं होते. मी अध्यक्षांना खाजगीत सांगायचो की, संधी मिळाली तर पुन्हा मंत्री व्हा. पण तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. मला त्याबाबत खोलात जायचं नाही असे सांगत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बसल्या जागेवरूनच म्हणाले की, सासऱ्यांचा आग्रह होता की अध्यक्षच करायचं असे सांगताच सभागृहात एकचं हशा उसळला.
देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानावर जयंत पाटील यांनी हळुच चिमटा काढत म्हणाले की, सासऱ्यांचे तुम्ही किती ऐकता हे अलिकडच्या काळात चांगलंच कळायला लागलं, पण सासऱ्याच्या आग्रहावरून त्यांना अध्यक्ष पद मिळालं असं म्हणणे म्हणजे त्यांच्या कर्तबगारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासारखे असल्याचा चिमटाही यावेळी देवेंद्र फडणवीस यांना काढला. त्यावर पुन्हा हास्याची लकेर सभागृहात उमटली.
यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी त्यांचा पहिल्यांदा विधानसभेत निवडणूक आल्यानंतरचा किस्सा सांगत होते. नेमक्या त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या गोष्टीची आठवण करून दिली. त्यावरून जयंत पाटील म्हणाले की, बघा म्हणजे माझ्यावर किती लक्ष आहे याचं असे सांगत अहो पण आपल्या पक्षाची भूमिका एकच असल्याची आठवणही यावेळी अजित पवार यांना करून दिली.
दरम्यान, विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे सासरे रामराजे नाईक-निंबाळकर हे विधान परिषदेचे अध्यक्ष म्हणून मागील वर्षापर्यंत कार्यरत होते. त्यामुळे विधान परिषदेत सासरे तर विधानसभेच्या अध्यक्ष पदी जावई राहुल नार्वेकर अशी चर्चा मधल्या काळात ऐकायला मिळत होती. त्यानंतर पहिल्यांदाच सासरे- जावई यांच्या अध्यक्ष-सभापती पदावरून पहिल्यादाच विरोधात नसली तरी मिश्किलीत सभागृहात चर्चा झाल्याचे या निमित्ताने पाह्यला मिळाले.
Marathi e-Batmya