लोकसभा निवडणूकीसाठी काल सातव्या टप्प्यासाठी मतदान पार पडल्यानंतर अनेक प्रसारमाध्यमांनी एक्झिट पोलच्या माध्यमातून कोणत्या राजकिय पक्षाला आणि आघाडीला किती जागा मिळणार याविषयीचा अंदाज व्यक्त केला. मात्र देशातील प्राप्त परिस्थितीचा नेमका विरोधभास दाखविणारे अंदाज सर्वच एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. या एक्झिट पोलवरून भाजपामधील प्रवेशासाठी इच्छुक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी मात्र महाराष्ट्रात सर्वाधिक जागा महाविकास आघाडीला मिळणार असल्याचे सांगत फोडाफोडीच्या राजकारणाचा भाजपाला चांगलाच फटका बसणार असल्याचे सांगत डिवचले.
भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील या एक्झिट पोलवरून म्हणाले की, महाराष्ट्राबाबतचे एक्झिट पोलमधून सांगण्यात आलेले आकडे यावेळी चुकणार असून सर्वाधिक जागा महायुतीला मिळणार आहे.
यावेळी एकनाथ खडसे यांना विचारले की, भाजपाला फोडाफोडीच्या राजकारणाचा फटका बसणार आहे का, त्यावर एकनाथ खडसे म्हणाले की, भाजपाने महाराष्ट्रात जे फोडाफोडीचे राजकारण केले. त्याचा फटका निश्चित भाजपाला बसणार आहे. राज्यभरात फोडाफोडीचे राजकारण राज्यातील जनतेने अमान्य केले आहे. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्याकडे गेला तर उद्धव ठाकरे यांचा पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे गेला. ज्यांनी पक्षासाठी रात्रंदिवस घाम गाळला, पक्ष उभा केला, त्यांचा मूळ पक्ष त्यांच्या हातातून इतरांच्या हाती जाणं हा फोडाफोडीच्या राजकारणाचा परिणाम असल्याचे सांगितले.
पुढे बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, या प्रकारामुळे अजित पवार यांना आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला फारसा प्रतिसाद निवडणूकीत मिळाला नाही. राज्यात दोन नंबरचा पक्ष हा उद्धव ठाकरे यांचा राहणार असून शरद पवार यांच्या पक्षाला १० पैकी ८ ते ६ जागा मिळतील असा अंदाज एक्झिट पोलमध्ये दाखविण्यात आल्याचे सांगितले.
दरम्यान, राज्यात लोकसभा निवडणूकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात काटे की टक्कर होणार असे दिसते. एकाबाजूला महाविकास आघाडीचे नेते सांगत आहेत की, किमान ३५ जागा महाविकास आघाडीला मिळणार तर भाजपाचे नेते सांगत आहे की, ४० ते ४१ जागा महायुतीला मिळणार म्हणून. परंतु आता घोडा मैदान जवळ आलेले असल्याने नेमका कोणाचा दावा खरा ठरणार हे आता लवकरच कळून येणार आहे.