उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली आणि हर्षिल परिसरात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या भूस्खलन व पुरस्थितीत अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. या पर्यटकांना जॉली ग्रँड विमानतळ आणि मताली कॅम्प येथे आणण्यात आले असून ते सुखरूप आहेत. उर्वरित एक पर्यटक श्रीमती कृतिका जैन यांचा शोध अद्याप सुरू असून त्यासाठी संबंधित यंत्रणा कार्यरत आहेत. यामधील बहुतांश पर्यटक आज महाराष्ट्रात परतणार असून, काही पर्यटक त्यांच्या पुढील यात्रांसाठी रवाना झाले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाराज हे उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात धराली येथे घडलेल्या घटनेनंतर तातडीने राज्यातील पर्यटकांच्या मदत व बचाव कार्यासाठी दाखल झाले. राज्य शासनाने या घटनेदरम्यान विशेष नियंत्रण कक्ष सुरू करून नातेवाईकांकडून माहिती घेऊन या ठिकाणच्या राज्यातील पर्यटक नागरिकांना आवश्यक मदत पोहचवून ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यास प्राधान्य दिल्याची माहिती दिली.
पुढे बोलताना गिरीश महाजन यांनी सांगितले, उत्तरकाशीतील भूस्खलन, पूरस्थिती घटनेत राज्यातील सर्व पर्यटक सुखरूप आहेत, याचा आनंद आहे. राज्यातील लोक अडचणीत असतील, तर त्यांची सुरक्षितता ही आपली जबाबदारी आहे. त्यानुसार उत्तराखंड सरकार, स्थानिक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी राज्यातील एकत्रितपणे कार्य करून पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले.
शेवटी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले, जे पर्यटक राज्यात परतणार आहेत त्यांची राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या समन्वयातून परतीची व्यवस्था करण्यात येत आहे. यामुळे उत्तरकाशी येथे अडकलेल्या पर्यटक नागरिकांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला असल्याचेही सांगितले.
Marathi e-Batmya