हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना दिलेल्या १६ आश्वासनांचे काय झाले? यवतमाळच्या आर्णीतून सुरु झालेला शेतकरी संघर्षाचा आवाज मुंबईमार्गे दिल्लीपर्यंत पोहचवू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी गावात २०१४ साली ‘चाय पे चर्चा’ करत शेतकऱ्यांसाठी भरमसाठ घोषणा केल्या. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, शेतकरी कर्जमाफी करणार, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देणार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार, दरवर्षी २ कोटी रोजगार देणार अशा घोषणा केल्या पण ११ वर्षात यातील एकही घोषणा पूर्ण केलेली नाही. शेतकऱ्यांची अवस्था आज अत्यंत बिकट झालेली आहे, म्हणून शेतकऱ्यांसाठी काँग्रेस पक्षाने सन्मान यात्रा काढली असून या यात्रेचा आवाज आर्णीतून मुंबईमार्गे दिल्लीत पोहचवू, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली लोकसभा निवढणुकीच्या प्रचारात दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी येथील ओंकारेश्वर मंदिरापासून शेतकरी सन्मान पदयात्रा काढण्यात आली. यात्रा सुरु करण्याआधी हर्षवर्धन सपकाळ यांनी पोहरादेवीचे दर्शन घेतले. या पदयात्रेचा समारोप कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सभेने झाला. यावेळी माजी मंत्री, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्या व प्रदेश कार्याध्यक्ष खा. प्रणिती शिंदे, खा. प्रतिभाताई धानोरकर, माजी मंत्री अनिस अहमद, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, माजी मंत्री वसंत पुरके, आ. राजेश राठोड, आ. अनिल मांगुळकर, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफुल्ल मानकर, सचिन नाईक यांच्यासह हजारो शेतकरी उपस्थित होते.

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटले जाते, लाखो गेले तरी चालतील पण पोशिंदा जगला पाहिजे असे म्हटले जाते पण या पोशिंद्याचेच प्रचंड हाल होत आहेत. आज हरभरा, कापूस, सोयाबीन, तूर, कांद्यासह कोणत्याच मालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येतात, कष्टाचा पैसा मिळत नाही. सोयाबीन तेलाची किंमत १६५ रुपये लिटर आहे आणि सोयाबीनला भाव मात्र किलोला ३५-४० रुपये मिळतो. तेलाचा भाव पाहता सोयाबीनला ९ हजार रुपये भाव मिळाला पाहिजे पण तो मिळत नाही, मधला मलिदा कोण खातो तर तो अदानी खातो. भाजपाने हर घर तिरंगा अभियान केले पण त्यासाठीचे झेंडे मात्र पॉलिस्टरमध्ये बनवले आणि हे पॉलिस्टर चीनमधून मागिवले. भाजपा सरकार फक्त अदानी-अंबानीचे भले करत आहे. आज या सरकारला जाब विचारला पाहिजे, आज जाब विचारला नाही तर भविष्यकाळ अत्यंत कठीण असेल. शेतकऱ्यांसाठी काँग्रेस पक्ष लढाई लढत आहे या लढाईत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही केले.

यावेळी गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, खा. प्रणिती शिंदे, खा. प्रतिभा धानोरकर यांनी भाजपा सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर कडाडून हल्ला चढवला.

About Editor

Check Also

मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांसाठी आपत्कालिन सूचना मुंबई जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, पोलीस नियंत्रण कक्ष सज्ज

मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार व महाराष्ट्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *