हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, राहुल गांधी भारतीय जनता पक्षाच्या धमक्यांना घाबरणारे नेते नाहीत मुंबई विमानतळावर राहुल गांधी यांचे काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत

जननायक राहुल गांधी हे देशहितासाठी निडर आणि बेधडकपणे काम करत आहेत. देशातील लोकशाही व संविधान रक्षणासाठी ते कशाचीही तमा न बाळगता लढत आहेत. स्वतःच्या जिवाला धोका असतानाही कन्याकुमारी ते काश्मीर व मणिपूर ते मुंबई अशी हजारो किलोमिटरची पदयात्रा काढून ‘भारत जोडो’ व ‘डरो मत’चा संदेश त्यांनी जनतेला दिला आहे. भाजपा धमकी देणारा व पाठीत वार करणारा पक्ष आहे. राहुल गांधी भाजपाच्या धमक्यांना घाबरत नाहीत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे एका न्यायालयीन प्रकरणासंदर्भात भिवंडी येथे जाताना मुंबई विमानतळावर आले असता काँग्रेस नेते व पदाधिकारी-यांकडून त्यांचे विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान, मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, माजी मंत्री आमदार अस्लम शेख, आमदार अमिन पटेल, आमदार ज्योती गायकवाड, राष्ट्रीय सचिव कुणाल चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष राजेश शर्मा, रामचंद्र ऊर्फ आबा दळवी, मुंबई युवक काँग्रसच्या अध्यक्षा झीनत शबरीन, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत शंभरपेक्षा अधिकवेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबदद्ल अपमानकारक विधाने केली आहेत, त्यांचा निषेध करण्याचे धाडस भाजपाने करून दाखवावे. ऑपरेशन सिंदूर सुरु असताना युद्धविरामची घोषणा अमेरिकेतून डोनाल्ड ट्रम्प यांनी का केली? देशातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्थ करणारा अमेरिकेबरोबरचा व्यापार करार दबावाखाली का केला? डोनाल्ड ट्रम्प भारताची दररोज बदनामी करत असून आपल्या देशाच्या अब्रुची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगली आहेत, त्याची काळजी भाजपाने करावी. राहुल गांधी यांच्याविरोधात आंदोलन करून भाजपा स्वतःचेच हसे करून घेत आहे, अशी टीकाही यावेळी केली.

About Editor

Check Also

राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आवाहन : माझी वसुंधरा हे ईश्वरीय कार्य ‘माझी वसुंधरा’ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

पर्यावरण रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून सुरु असलेले कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. माझी वसुंधरा अभियानाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *