महात्मा ज्योतीबा फुले यांचे महाराष्ट्रासाठी व देशासाठी मोठे योगदान आहे. सत्यशोधक चळवळ, पुरोगामी चळवळीचा वारसा, त्यांनी घालून दिलेली सामाजिक न्यायाची सांगड आजही अत्यंत महत्वाची आहे. महात्मा ज्योतीबा फुलेंचा विचार पुढे घेऊन जायची गरज आहे व काँग्रेस पक्ष त्याचा विचारातून वाटचाल करत आहे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
सत्यशोधक चळवळीचे प्रणेते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुणे येथील महात्मा फुले वाड्याला भेट देवून अभिवादन केले. यावेळी पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस भानुदास माळी, नगरसेवक प्रशांत जगताप, माजी आमदार दीप्ती चौधरी, शहर उपाध्यक्षा प्राची दूधाने, अविनाश बागवे, राज अंबिके तसेच काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, महात्मा ज्योतीबा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. तर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरु करून महिलांना शिक्षणाची दारे उघडून महिला सक्षमीकरणाचे एक महत्वाचे पाऊस उचलेले. या क्रांतीकारी निर्णयाला मात्र मनुवादी विचारांनी तीव्र विरोध करत सावित्रीबाईंना प्रचंड त्रास दिला, त्यांचा छळ केला. मनुवादी विचारांना काँग्रेसचा विरोध यातूनच आहे आणि सावित्रीबाईंना छळणाऱ्या विचारांचे लोक आज सत्तेत आहेत असेही सांगितले.
महात्मा ज्योतीबा फुलेंच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त वर्षभर विविध उपक्रम राबविणार..
२०२६ हे वर्ष महात्मा ज्योतिबा फुले यांचे जन्म द्वीशताब्दी वर्ष विविध उपक्रम आणि सत्यशोधक विचारांचा जागर करण्याची विशेष मोहीम प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून राज्यभर वर्षभर राबविली जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने महात्मा फुले उत्सव समिती स्थापन केली आहे. या समितीची नियोजन बैठक प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवन पुणे येथे संपन्न झाली. या बैठकीला समितीचे अध्यक्ष भानुदास माळी, वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, किशोर कान्हेरे, भाई नगराळे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार दीप्ती चौधरी, वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी, पुणे मनपा गटनेते चंदूशेठ कदम, नगरसेवक प्रशांत जगताप, सुनील शिंदे, सुनील मलके, प्रदेश सरचिटणीस सीमा गुट्टे, आमिर शेख, यशराज पारखी यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीवर महायुती सरकार गप्प का?
बारामती पोटनिवडणुकीच्या प्रश्नावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, काँग्रेस पक्षाने सर्वांच्या विनंतीचा विचार करून अजित पवारांसाठी सहानुभूती म्हणून अर्ज माघारी घेतला आहे. परंतु कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिलेला नाही, असे असले तरी काँग्रेस पक्षाची भूमिका कायम आहे. अजित पवार यांच्या अपघाताचा गुन्हा दाखल करावा यासाठी काँग्रेस पक्ष आजही आग्रही आहे. महाराष्ट्रात गुन्हा दाखल केला नाही मात्र काँग्रेसशासित कर्नाटक राज्यात गुन्हा दाखल केलेला आहे व त्याचा पाठपुरावा काँग्रेस करत आहे. अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी कर्नाटकच्या गृहमंत्र्यांशी आम्ही चर्चा करून लक्ष घालण्याची विनंती केली, त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाचे आमदार रोहित पवार तातडीने बंगळुरूला गेले, त्यांच्यासोबत काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी कर्नाटकच्या गृहमंत्र्यांशी भेट घेऊन पाठपुरावा करण्याची विनंती केली. तसेच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याशीही अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीसाठी आम्ही चर्चा केली पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या एनसीपी पक्षातील मंत्री व नेते यावर काहीच बोलत नाहीत, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असेही म्हणाले.
Marathi e-Batmya