उध्दव ठाकरे यांचे आव्हान, रशिया-युक्रेन युध्द थांबविल्याच्या भाकडकथा सांगता मग मणिपूर… पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यावर साधला निशाना

जर्मनीत हिटलरही सत्तेत आला होता. त्यानेही सुरुवातीला सर्व प्रसारमाध्यमांवर नियंत्रण मिळवले. जेणेकरून त्याच्या विरोधात बातम्या येऊ नये यासाठी. तसाच काहीसा प्रकार आपल्याकडेही सुरु असून सध्या जे काही सुरु आहे तो प्रकार सत्तेची मस्ती आहे, हा जो तुमचा फुगलेला फुगा आहे तो फोडायला वेळ लागणार नाही. एवढीच मस्ती असेल तर मणिपूरमध्ये दाखवा. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सचे अधिकारी मणिपूरमध्ये पाठवा, परत येतात का बघा. अमित शाह मणिपूरमध्ये जाऊन आले पण उपयोग झाला नाही. मणिपूर राज्य पेटलेलं असून तुम्ही (पंतप्रधान नरेंद्र मोदी) अमेरिकेला निघाला आहात. रशिया आणि यूक्रेन युद्ध थांबवल्याची भाकडकथा सांगता, ती कथा खरी करायची असेल तर मणिपूरमध्ये जाऊन दाखवा असे थेट आव्हान शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं राज्यव्यापी पदाधिकारी शिबीर मुंबईत आयोजित करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, पानीपतचं युध्द झालं त्यावेळी देशावर चालून आला होता. त्यावेळी समोर जमलेले मराठा सैनिक पाहून त्याने त्यांच्या खबऱ्याला विचारलं ते समोर काय आहे, तर त्याने सुरुवातीला घोडे असल्याचे सांगितले, नंतर दुसऱ्या एका रांगेकडे पहात विचारलं तर त्याने सांगितलं हे अठारापगड जातीचे लोक आहेत. मग तिसऱ्या एका रांगेकडे बोट दाखवून विचारलं तर खबऱ्याने सांगितले ती जेवणाची पंगत उठण्याची ठिकाणे आहेत. त्यावर अब्दाली म्हणाला जी माणसं जेवणासाठी एकत्र येत नाहीत ती लढाईसाठी आणि मरणासाठी एकत्र कशी येतील असे सांगत विजय आपलाच असल्याचा विश्वास व्यक्त केला.

त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी बोलताना सांगितले, महिलेवर अत्याचार केला म्हणून मी एकाला मंत्रिमंडळातून गेट आऊट केला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत गेलेल्यांमधील लोकच म्हणत होते तो आपला माणूस आहे म्हणून. आता त्याला मंत्रिमंडळातही घेतलं आहे आणि सत्तेसाठी सत्तारांना सोबत ठेवतात, अशी टीका केली.

अयोध्या पौळवर शाईफेक झाली, शिंदे गटाकडून या महिलेला मारहाण झाली. आता महिला गुंड तयार झाल्या आहेत. या पुढं अन्याय करणाऱ्यांना शिवसैनिक काय असतं ते दाखवून द्या, असं सांगत तुम्ही हात उचलू नका कुणी हात उचलला तर हात वेगळा करा, असा आदेश उद्धव ठाकरेंनी दिला.

गद्दारांच्या फौजेचं नेतृत्त्व करण्यापेक्षा मूठभर निष्ठावतांचं नेतृत्त्व करणं कधीही मान्य करेन, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, विधानभवनात बॉम्बची अफवा ही ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेचा परिणाम विधानभवनही सुरक्षित नाही तर जनतेच्या सुरक्षेचे काय

इराणच्या विरोधात अमेरिका आणि इस्रायलने पुकारलेल्या युद्धामुळे देशभरात एलपीजी गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा आहे त्याला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *