बदलापूर लैगिंक शोषण प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी अक्षय शिंदे याला खोट्या चकमकीत पोलिसांनी हत्या केली असल्याचा ठपका, दंडाधिकाऱ्यांच्या अहवाल ठेवण्यात आला आहे. तसेच हा अहवाल मुंबई उच्च न्यायालयानेही स्विकारला आहे. तसेच या चकमकीत पाच पोलिसांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. त्यातच याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बलात्कार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदे याची हत्या करण्यात आल्याचे वक्तव्य केले. त्यावरून सर्वपक्षिय आक्रोश मोर्चातील भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी नाराजी व्यक्त केली.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणि परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणी आज मुंबईतील मेट्रो सिनेमा ते आझाद मैदाना दरम्यान मोर्चा काढण्यात आला. या मोर्चासमोर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी हे वक्तव्य केले.
यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, अक्षय शिंदेला ज्या अंतरावरून गोळी झाडली. ते अंतर हस्यास्पद आहे. त्याच्या हाताला बेड्या होत्या. मग तो कोणत्या हाताने रिव्हॉलवर काढणार होता असा सवाल करत आता तर हे ही स्पष्ट झालंय की, त्या रिव्हॉलवरवर अक्षय शिंदे यांच्या हाताचे ठसेच नाहीत. हे प्रकरण बलात्काराचं असल्याने लोक बोलायला घाबरतात. पण अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही असेही यावेळी सांगितले.
जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की, बलात्कार केलेल्यांना सोडण्याकरता अक्षय शिंदे याची हत्या करण्यात आली. मग बलात्कार केलेले कोण होते असा सवाल करत जे मी वर्चस्ववादाची लढाई म्हणतोय अक्षय शिंदेची हत्या झाल्यानंतर ते लगेच हजर झाले. यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांची मेमरी शॉर्ट असते या एकाच गेमवर सरकार खेळत असतं अशी टीकाही यावेळी केली.
पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, अक्षय शिंदे याला जिथे मारलं तो मतदारसंघ माझा आहे. त्याला जिथे मारलं तिथे बाजूलाच एक चायवाला होता. त्याने मला फोन करून सगळं सविस्तर सांगितल. दुपार पर्यंत अक्षय शिंदे याचं प्रकरण बाहेर आलं. आता प्रश्न आहे की, अक्षय शिंदे याच्यावर ज्या पोलिसांनी गोळ्या झाडल्या त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आणि चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. न्यायालयाने पहिल्याच दिवशी विचारलं होतं की, हे असं कसं होऊ शकतं. उच्च न्यायालयाने स्वतःहून याचिका उचलली होती. पण प्रश्न हा आहे की याप्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झालेला नसल्याचेही यावेळी सांगितले.
शेवटी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आम्ही लहानपणापासून गॅगवॉर आणि पोलिस पाहतोय. पोलिस काय करू शकतात हे दाऊदला सर्वात जास्त माहित होतं म्हणून तो दुबईला पळाला. त्याला माहितेय मुंबईतले खरे भाई पोलिसच आहेत. ज्या दिवशी ठरवतील त्या दिवशी त्याचं जगंण मुश्किल करतील त्यामुळे तो इथून पळून गेल्याचेही यावेळी सांगितले.
दरम्यान, जनआक्रोश मोर्चातील भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी मात्र जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यासंदर्भात नाराजी व्यक्त करत जितेंद्र आव्हाड यांनी जे वक्तव्य केले ते काही आपल्याला आवडले नाही असे जाहिर केले. मात्र त्या वक्तव्यावरून मी काही त्यांच्याशी वाद घालणार नसल्याचेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya