मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश, अंगावर आले तर शिंगावर घ्या उदय सामंत हल्लाप्रकरणी पोलिस प्रशासनाला निर्देश

काल रात्री उशीरा राज्याचे माजी मंत्री आणि एकनाथ शिंदे समर्थक आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर काही जणांनी हल्ला करत त्यांना इजा करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आज काही शिवसैनिकांना अटक केल्याचे सांगण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत यासंदर्भातील चर्चे दरम्यान शिंदे समर्थक आमदारांच्या सुरक्षेत वाढ करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देत अंगावर आले तर शिंगावर घ्या असे स्पष्ट आदेश दिल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली.

काल सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद रॅलीली मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. त्यानंतर रात्री पुण्यातील कात्रज येथे आदित्य ठाकरे यांच्या जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
विशेष म्हणजे काल दिवसभर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ही विविध बैठकांच्या निमित्ताने पुण्यातच होते.

परंतु रात्री मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासोबत असलेले उदय सामंत हे मध्येच हा ताफा सोडून देत कात्रज परिसरात आपल्या ताफ्यासह पोहोचले. नेमके त्याचवेळी आदित्य ठाकरे यांची सभा संपली होती. त्यानंतर अनेक शिवसैनिक जायला निघाले होते. दरम्यान एका सिग्नल जवळ उदय सामंत यांची गाडी उभी असताना काही शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. या हल्ल्यात सामंत यांच्या गाडीची मागील काच फुटली. मात्र पोलिसांनी वेळीच प्रसंगवधान राखत हल्लेखोरांपासून उदय सामंत यांचा बचाव करत त्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढले. विशेष म्हणजे अनेक शिंदे समर्थक आमदारांना यापूर्वीच केंद्र सरकारकडून वाय दर्जाची सुरक्षा पुरविली आहे. तरीही त्यांच्यावर हल्ला झाला.

उदय सामंत यांच्यासह त्यांच्यासोबत असणाऱ्या कोणालाही कोणतीही ईजा झाली नाही. त्यानंतर हल्ल्याबाबतचा मुद्दा उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानी घातला. त्यामुळे आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरील निर्देश पोलिस महासंचालकांना दिल्याचे त्यांनी सांगितले.

त्यामुळे यापुढील काळात उध्दव ठाकरे गटातील समर्थकांवर भविष्यकाळात गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असून शिंदे समर्थक आणि ठाकरे समर्थक यांच्यात रस्त्यावरील लढाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

About Editor

Check Also

राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आवाहन : माझी वसुंधरा हे ईश्वरीय कार्य ‘माझी वसुंधरा’ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

पर्यावरण रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून सुरु असलेले कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. माझी वसुंधरा अभियानाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *