मुंबईः प्रतिनिधी
विधानसभा सभागृहाची आयुध गोठवे, तारांकित प्रश्न व्यपगत करणे, हरकतीच्या मुद्द्यांवर बोलू न देणे, याबाबत संताप व्यक्त करणारे भाजपा सदस्य जेव्हा अध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत गेले त्यावेळी त्यांना मागे आणण्यासाठी गेलो असताना, अध्यक्षांच्या दालनात कोणत्याही प्रकारची शिविगाळ झालेली नसताना, उलट तालिका अध्यक्षांची क्षमा मी पक्षाच्यावतीने स्वतः मागितली असतानाही मला सस्पेंड केले गेले . ही ठाकरे सरकारची तालिबानी वृत्ती असल्याचा आरोप भाजपाचे विधानसभेतील मुख्य प्रतोद अँड. आशिष शेलार यांनी केला.
विधानसभेत जेव्हा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसींचा ठराव मांडला, त्यावेळी त्यामध्ये असणाऱ्या तृटी दाखवून ओबीसी समाजाचे नुकसान होऊ नये म्हणून मी हरकतीचा मुद्दा मांडून बोलू इच्छित होतो, पण त्यावर बोलू दिले नाही. तसेच मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या वक्तव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी जे विधान केले त्याबद्दल हरकत घेऊ इच्छित असताना तालिका अध्यक्षांनी बोलू दिले नाही. पंतप्रधान पद आणि नरेंद्र मोदी यांच्या विषयी गैरसमज पसरवणारी विधाने मंत्र्यांनी केली ती कामकाजात राहू नये ही बाब लक्षात आणून देण्यासाठी बोलू द्या अशी मागणी मी वारंवार करीत होतो. पण `आमदारांना बोलू न देता लोकशाहीचा गळा घोटला जात असताना ओबीसी समाजाचे आरक्षणावरुन नुकसान होईल असे सभागृहाच्या पटलावर येत होते. म्हणूनच भाजपाचे काही आमदार आक्रमक झाले. तालिका अध्यक्षांकडे आम्हाला बोलू द्या अशी मागणी करीत अध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत पोहचले. त्यांना मी मागे घेण्यासाठी गेलो हे सभागृहात सर्वांनी पाहिले. त्यानंतर अध्यक्षांच्या दालनात सुध्दा आम्हाला बोलू द्या अशी मागणी आमदार करीत होते. पण त्यांचे म्हणणे ऐकले नाही. आम्ही कोणत्याही प्रकारची शिवीगाळ केलेली नाही. पण तालिका अध्यक्षांना शिवीगाळ केली असे वाटले तेच ग्राह्य धरुन. आम्हाला सस्पेंड केल्याचे त्यांनी सांगितले.
माझ्या सोबत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना सभागृहात सामना करू शकत नाहीत त्यांनी नो बॉलवर माझी अशी विकेट काढण्याचा प्रयत्न केला आहे. पण मी क्रिकेट खेळणारा आहे आता जनतेमध्ये जाऊन या तालिबानी कारभार करणाऱ्या पक्षांना उघडे पाडू. यांना सभागृहाबाहेर “आऊट” करु. आम्ही यांच्या दडपशाहीला घाबरणार नाही. ऑफ स्पिन, लेग स्पिन टाकून आऊट करेन असा इशाराही त्यांनी दिला.
Marathi e-Batmya